श्रीसमर्थांनी श्रीमत दासबोध ग्रंथाची रचना एका विशिष्ट व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून केली आहे. साहित्य आणि वाङ्मय यात खूप बारीक अंतर आहे. साहित्य हा शब्दांचा खेळ आहे. पण वाङ्मय हे शब्दरूपी अमृत आहे. त्यात संत वाङ्मय म्हणजे मनुष्यजीवनाला कायमस्वरूपी मिळालेली संजीवनी आहे. संत वाङ्मयातून केवळ जीवनच कळते असे नव्हे तर जग, जीवन आणि जगदीश्वर यांचे मूळ स्वरूप कळते. स्वार्थ आणि परमार्थ याची सांगड सामान्य मनुष्याने, साधकाने कशी घालावी हे श्रीसमर्थ व्यावहारिकदृष्टय़ा ग्रंथराज दासबोधातून पटवून देतात. दासबोधाच्या अभ्यासाने क्रिया तात्काळ पालटते. स्वभावात, वृत्तीत बदल होतो. मनुष्याचे अंतःकरण शुद्ध व्हायला सुरुवात होते. भाव तसा देव असे म्हटले जाते. श्रीमतदासबोध ग्रंथ जो ज्या भावाने वाचेल त्यास तशाप्रकारे फळ मिळेल. श्रीसमर्थांनी दासबोधाची रचना एकूण वीस दशकांमध्ये केली आहे. यात स्तवन, मूर्खलक्षण, स्वगुण परीक्षा, नवविधा भक्ती, मंत्र, देवशोधन, चौदा ब्रह्म, मायोद्भवनाम ज्ञानदशक, गुणरूप, जगज्जोतीनाम, भीमदशक, विवेक वैराग्य, नामरूप, अखंड ध्याननाम, आत्मदशक, सप्ततिन्वय, प्रकृतीपुरुष, बहुजिनसी, शिकवण, पूर्णदशक असे एकूण वीस दशक मांडलेले आहेत. त्यातील प्रत्येक दशकात दहा समास आहेत. अशा एकूण दोनशे समासांनी परिपूर्ण असलेला हा ग्रंथराज दासबोध म्हणजे ज्ञानरूपी महासागरच आहे. व्यवस्थापनशास्त्रात ज्याप्रमाणे मूळ उद्दिष्ट किंवा ध्येय गाठायचे असेल तर आधी त्या ध्येयाच्या मुळाशी जावे लागते, त्याचप्रमाणे श्रीसमर्थांनी दासबोधाची निर्मिती ही मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येकाच्या मूळ ध्येय किंवा उद्दिष्ट प्राप्तीकरिता केलेली आहे. लौकिक जीवनात सगळेच मनुष्य जीवन जगत असतात. त्यांची प्रत्येकाची जीवन जगण्याची काही ध्येये ठरलेली असतात. पण ही ध्येये परिपूर्ण नसतात. ईश्वराची प्राप्ती हेच मानवी जीवनाचे मूळ ध्येय असावे. पण हे ध्येय अनेकांना माहिती नसते. काहींना माहिती असते पण त्यांना योग्य मार्ग माहीत नसतो. कारण, मानवी व्यवहारामध्ये गुंतल्याने त्यातून कसे बाहेर पडावे आणि श्रे÷ दर्जाचे जीवन जगून ईश्वराची प्राप्ती कशी करावी हे कळत नाही.जन्माला आल्यानंतर मानवी भावभावना, त्यातून निर्माण होणारे सुख-दुःख, यातना, क्लेश, अहंकार, द्वेष, आनंद, समाधान यातच सामान्य मनुष्य गुंतून पडतो. त्यामुळे पुन्हा तो जन्म-मृत्युच्या सापळय़ात अडकतो आणि अनेक जन्म या भू लोकावर घालवतो. मनुष्याने स्वतःचा ऐहिक आणि पारमार्थिक उत्कर्ष कसा करावा याचा राजमार्ग सांगणारा ग्रंथ म्हणजेच दासबोध!
पहिल्या दशकातील ग्रंथारंभलक्षण समासात श्रीसमर्थांनी ग्रंथ कुठल्या उद्दिष्टाने लिहिला आहे ते सांगितले आहे. त्यामुळे वाचकांना, साधकांना ग्रंथाची नीट कल्पना येऊन त्यांची ग्रंथ वाचनाची रुची अधिकाधिक प्रमाणात वाढत जाते. या समासात श्रीसमर्थ ग्रंथ वाचनाचे फळ काय आहे ते सांगतात, नाना धोकें देहबुद्धीचे। नाना किंत संदेहाचे । नाना उद्वेग संसाराचे । नासती श्रवणे ।। ऐसी याची फळश्रुती । श्रवणें चुके अधोगती । मनास होय विश्रांती । समाधान ।। जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा । मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंची प्राप्त ।। 36-37-38/01/01 म्हणजे ‘मी देह आहे’ या समजुतीने जीवनात अनेक कठीण प्रसंग निर्माण होतात. संशयाने अनेक प्रकारचे भ्रम निर्माण होतात. हे सगळे काही संशय आणि दुःखाचे प्रसंग दासबोधाच्या अभ्यासाने लोप पावतात. जीवनाची अवनती थांबते आणि मनुष्याला खरी विश्रांती व समाधान प्राप्त होते. दासबोध अभ्यास करणाऱयाची जशी मनोवृत्ती असेल तसे त्याला फळ मिळते. मत्सरवृत्तीने, द्वेषाने जो ग्रंथ वाचन करेल त्यास तसेच फळ मिळेल. व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टीने या ओवी खूप महत्त्वपूर्ण आहेत. ज्यांना उत्तम व्यवस्थापक व्हायचे असेल त्याने/तिने स्वतःमधील देहबुद्धी म्हणजेच अहंकार दूर सारूनच कार्य करायला हवे. तसेच संशय निर्माण होईल अशी वृत्ती समूळ नष्ट करून मार्गाक्रमण करायला हवे. याकरिता सातत्याने श्रीमतदासबोधाचा अभ्यास करायला हवा तरच अहंकार आणि संशय दूर होईल. श्रीसमर्थांनी त्यापुढील गणेशस्तवन समासात श्रीगणेशाचे वर्णन आणि गणेशाच्या भक्तीने मिळणारे फळ याविषयी असे सांगितले आहे की, ध्यान गणेशाचे वर्णितां ।मतिप्रकाश होये भ्रांता ।
गुणानुवाद श्रवण करितां । वोळे सरस्वती ।। ज्यासी ब्रह्मादिक वंदिती । तेथे मानव बापुडे किती । असो प्राणी मंदमती । तेहीं गणेश चिंतावा ।। जे मूर्ख अवलक्षण । जे का हिणाहुनी हीण । तेची होती दक्ष प्रवीण । सर्वविशई ।। 26-27-28/02/01
याचा अर्थ असा आहे की, श्रीगणेशाच्या रूपाचे चिंतन केल्याने अज्ञानी मनुष्याचे अज्ञान दूर होऊन त्या मनुष्याच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडतो. श्रीगणेशाच्या गुणांचे वर्णन केल्याने सरस्वती प्रसन्न होते. श्रीगणेश देवतेला ब्रह्मादिक देवदेवता वंदन करतात. त्याच्या पुढे मनुष्याला काय किंमत. तरीही ज्याची बुद्धी मंद असेल त्याने गणेशाचे चिंतन करावे. जे अवलक्षणी, मूर्ख किंवा हीन असतात ते गणेशाच्या चिंतनाने सर्व विषयात पारंगत होतात. व्यवस्थापनशास्त्राच्या दृष्टीने या ओव्यांचा विचार केल्यास श्रीगणेशदेवता म्हणजेच ज्ञान आणि माहिती. व्यवस्थापनशास्त्रात ज्ञान आणि माहिती हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जे उत्तम व्यवस्थापक असतात त्यांना मिळालेल्या माहितीतूनच ज्ञानाची प्राप्ती होते आणि त्यांना ज्ञान असेल तरच ते इतरांना माहिती देऊ शकतात. ज्यांना उत्तम व्यवस्थापक व्हायचे असेल त्यांनी ज्ञानप्राप्ती सातत्याने करावी.
त्यापुढील संतस्तवन समासात श्रीसमर्थ असे म्हणतात की, जेथे परीक्षवंत ठकले । नांतरी डोळस चि अंध जाले । पाहात असतांची चुकले । निजवस्तूसी ।। जें दीपाचेनि दिसेना । नाना प्रकाशें गवसेना । नेत्रांजनेंहि वसेना । दृष्टीपुढे ।। सोळां कळी पूर्ण शशी । दाखऊं शकेना वस्तूसी । तीव्र आदित्य कळरासी । तोही दाखवीना ।। 04-05-06/05/01 अनेक वस्तूंची जाण असणारे आत्मवस्तू जाणू शकत नाहीत. डोळे असूनही आत्मवस्तू पाहण्याबाबत आंधळेपणा अनुभवास येतो. स्वतःपाशी असणारी वस्तू पाहण्यास लोक चुकतात. दिव्याच्या प्रकाशाने ती दिसत नाही आणि इतर प्रकाशाने ती सापडत नाही. डोळय़ात अंजन घातले तरीही ती नजरेसमोर येत नाही. सोळा कळांनी पूर्ण असलेला चंद्र आणि तेजस्वी सूर्यदेखील ती वस्तू दाखवू शकत नाही. श्रीसमर्थांनी एकप्रकारे व्यवस्थापनशास्त्राच्या सूक्ष्म रूपाविषयीच या समासात सांगितले आहे. व्यवस्थापनशास्त्रसुद्धा अनेक जाणकार लोक जाणू शकत नाहीत. त्यांची दृष्टी, त्यांचे निरीक्षण कितीही उच्च दर्जाचे असले तरीही ते अनेक वेळा व्यवस्थापन म्हणजे नेमके काय हे जाणवून घेऊ शकत नाही. केवळ संत वाङ्मय आणि श्रीसमर्थांच्या दासबोधाच्या अभ्यासानेच व्यवस्थापनशास्त्र जाणवते, समजते आणि त्याची खोली कळते.
माधव किल्लेदार