प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत अन्यथा आंदोलन करु
युवा वर्गातून प्रशासकीय पातळीवर गांभीर्याने विचार करण्याची मागणी
प्रतिनिधी / कडेगाव
महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारवर १८ ते ४४ वयोगटातील तरूणांना लस दया असा दबाव वाढल्याने महाराष्ट्र शासनाने लस देणे सुरू केले. आज कडेगाव शहरातील महात्मा गांधी विद्यालयात लसीकरण सुरू झाले. मात्र या केंद्रावर खानापूर विटा, तासगाव, गडहिंग्लज या ठिकाणाहून धनिक व्यापारी तालुक्यातील युवकांची गर्दी झाली. त्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. कडेगाव तालुका सोडून दुसऱ्याच तालुक्यातील युवकांनी या लसीवर डल्ला मारला. याबाबतीत स्थानिक पातळीवर प्रचंड असंतोष उफाळला असून प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अगोदरच लसींचा तुटवडा ग्रामीण भागात असुविधा, थोडक्याच लसी आणि नोंदणीसाठी काही मिनिटातील उदिष्टपुर्ती यामुळे तरुण वर्ग लसीकरणापासून वंचित राहण्याचा धोका त्यातूनच कोरोनाचा संभाव्य धोका वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसात तरूणांचा मृत्यूदर वाढल्याने शासनाने १८ ते ४५ वयोगटातील तरूणांना लस देण्याचे अभियान १ मे पासून सुरू केले. मात्र या शासनाच्या अॅपवरुन कोणत्याही जिल्ह्या अथवा तालुक्यातील नागरिकांना लस घेण्यासाठी पर्याय दिले आहेत. यामुळे ज्या ठिकाणी कमी नोंदणी झाली आहे त्या ठिकाणच्या दवाखान्यात तरुण नाव नोंदणी करीत आहेत. आपल्या तालुक्यातील नोंदणी पुर्ण झाली की शेजारील तालुक्यातील दवाखान्यात नोंदणी करीत आहेत. यामुळे कडेगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात थेट नंबर लावूनच तालुक्यातील स्थानिक लोकांनाच लस द्यावी अशी तरूणांची मागणी आहे. या सर्व बाबींचा प्रशासकीय पातळीवर गांभीर्याने विचार होवून स्थानिक लसीकरण केंद्रावर स्थानिकांनीच नोंदणी व लसीकरण व्हावे यादृष्टीने आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात.
१८ ते ४४ वयोगटातील तरूणाईसाठी कडेगाव ग्रामीण रूग्णालयात लस देण्यात येते. सोमवारसाठीच्या लसीकरणासाठी रविवारी सात वाजता नाव नोंदणी सुरू होते. कडेगाव तालुक्यातील अनेकांना याचा थांगपत्ताही लागला नाही आणि तासगाव, विटा या शहरातील तरूणांची लसीकरणासाठीची नावनोंदणी पुर्ण पण होते. मात्र तालुक्यातील तरूणांनी अॅपवर नाव नोंदणी सुरू केली तर अॅपवर नावनोंदणी फुल झाल्याचे दाखवते. आज सकाळी लसीकरणासाठी महात्मा गांधी विद्यालयात चार चाकी व दुचाकींचा खच लागला. विशेष म्हणजे यामध्ये कडेगाव तालुक्यातील युवकांचा समावेशच नव्हता. विटा, तासगाव, गडहिंग्लज या ठिकाणाहून आलेल्या व्यापाऱ्यांचीच येथे मोठी गर्दी झाली होती. हा सर्व प्रकार लक्षात घेता असे दिसून येते की कोणीतरी हुशार संगणक तज्ञाने एकदम एवढी बाहेरच्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लोकांची नावे टाकलेली असावी. या सर्व बाबींचा प्रशासकीय पातळीवर गांभीर्याने विचार करावा अशी मागणी सध्या युवा वर्गातून होत आहे.