ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना संक्रमणाचा वेग आणि मृतांचे आकडे यांचे प्रमाण कमी अधिक होताना दिसत आहे. देशात बुधवारी एका दिवसात उच्चांकी म्हणजेच 4,529 मृत्यूंची नोंद झाली होती. या प्रमाणात घट झाली असून मागील 24 तासात 3,874 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मात्र, सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील 24 तासात देशात 2 लाख 76 हजार 070 नवे रुग्ण आढळून आले. मंगळवारी कोरोनाचे 2.67 लाख नवीन रुग्ण सापडले होते. तर कालच्या दिवशी 3 लाख 69 हजार 077 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 2 कोटी 57 लाख 72 हजार 400 वर पोहचली असून, मृतांची संख्या 2 लाख 87 हजार 122 एवढी आहे. तर आतापर्यंत 18 कोटी 70 लाख 09 हजार 792 जणांना लस देण्यात आली आहे.
सध्या देशात 31 लाख 29 हजार 878 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 2 कोटी 23 लाख 55 हजार 440 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील कोरोनाचा मृत्यू दर हा 1.11 टक्के इतका आहे तर रिकव्हरी दर हा 86 टक्के आहे. देशातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटून 13 टक्के झाली आहे. एकूण रुग्णसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागत असून अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. तर मृतांच्या संख्येत भारताचा अमेरिका, ब्राझिलनंतर तिसरा क्रमांक लागतो.
आतापर्यंत देशात 32 कोटी 23 लाख 56 हजार 187 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 20 लाख 55 हजार 010 कोरोना चाचण्या बुधवारी (दि. 19 मे 2021) एका दिवसात करण्यात आल्या.