नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. मोदींना लिहिलेल्या पत्रात नवोदय विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या, पण कोरोनामुळे आई-वडिल गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
देशात कोरोनामुळे अनेक परिवार उध्वस्त झाले आहेत. आई-वडिलांचं छत्र हरवल्याने कित्येक कुटुंबातील चिमुकली अनाथ बनली आहेत. अशा मुलांच्या भविष्याचे काय, असा प्रश्न निर्माण होतो. अशा स्थितीत सोनिया गांधी यांनी या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटले आहे की, आपणास ज्ञात आहेच, माझे पती स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशात नवोदय विद्यालयांची स्थापना केली. देशाच्या ग्रामीण भागातील युवकांना उच्च दर्जाच व सर्व सोयीयुक्ता तसेच आधुनिक आणि परवडणार शिक्षण मिळावं, हेच त्यांचं स्वप्न होतं. सध्या देशात 661 नवोदय विद्यालय आहेत. देशातील या 661 नवोदय विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या, पण कोरोना महामारीच्या संकटात आपले आई-वडिल गमावलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, अशी मागणी सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे केली आहे.
या अनाथ मुलांसोबत घडलेल्या दु:खामुळे आपण राष्ट्र म्हणून त्यांच्या पाठिशी उभा राहायला हवं व तसेच त्यांच्या भविष्याचा विचार करायला हवा, असे देखील सोनिया गांधी यांनी या पत्रात म्हटले आहे.