नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी येथे लॉकडाऊनचा कालावधी आठवडाभराने वाढवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दुपारी यासंबंधीची घोषणा करताना 31 मे सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू असणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनीही राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली.
दिल्लीत 19 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेपासून लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमध्ये वाढ करून 24 मेपर्यंत लॉकडाऊन दिल्लीत लागू होता. मात्र आता दिल्ली सरकारने लॉकडाऊन एक आठवडय़ाने वाढवला आहे. कडक निर्बंध आठवडय़ाने वाढवण्याची घोषणा करतानाच जूनपासून ‘अनलॉक’ सुरू करण्याचे संकेतही केजरीवाल यांनी दिले आहेत. लॉकडाऊनबाबत आम्ही अनेक तज्ञांचा सल्ला घेतला. त्यानंतर एक आठवडय़ासाठी लॉकडाऊन वाढवण्यावर एकमत झाले. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर लोक शिस्त पाळत असल्याचे निदर्शनास आल्यास 31 मे पासून अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्वरित अनलॉक करणे चांगले होणार नाही परंतु हळूहळू अनलॉक करणे सुरू होईल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.