राहुल गांधींच्या टीकेला केंद्रीय मंत्री जावडेकर यांचे प्रत्युत्तर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लसीकरण पूर्ण व्हायला 2024 साल उजाडेल असा शाब्दिक हल्लाबोल केंद्र सरकारवर केल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी डिसेंबर 2021 पर्यंत लसीकरण पूर्ण होईल, असा प्रतिटोला लगावला आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत 108 कोटी भारतीयांचे लसीकरण पूर्ण होईल, असे स्पष्टीकरण जावडेकर यांनी दिले आहे. राहुल गांधींनी देशात कोरोनाच्या दुसऱया लाटेला पंतप्रधानांची नौटंकी जबाबदार असल्याचा घणाघात पत्रकार परिषदेत केला. या टीकेलाही भाजपने तातडीने प्रत्युत्तर देत काँग्रेसची नौटंकी जनतेने कधीच बंद केली आहे, असा टोला लगावला. काँग्रेस नेते राहुल गांधी हे देशातील कोरोना परिस्थितीवर काहीही तर्क लावत असल्याने कोरोना टुलकिट हे काँग्रेसचे षड्यंत्र असल्याचेही जावडेकर यांनी नमूद केले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेनंतर भाजपनेतही त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. केंद्राकडे लसीकरणाचे धोरणच नसल्याची टीका केली. शिवाय देशात या वेगाने लसीकरण सुरु राहिले तर लसीकरण पूर्ण व्हायला 2024 उजाडेल असे ते म्हणाले. यावर उत्तर देताना जावडेकर यांनी लसीकरणाबाबतची भूमिका स्पष्टपणे मांडली. तसेच तुम्हाला जर लसीकरणाची एवढीच काळजी आहे तर जरा काँग्रेसशासित राज्यांकडे लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी केली. पंतप्रधान देशाच्या जनतेसोबत कोरोनाचा सामना करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना राहुल गांधी नौटंकी हा शब्द वापरत आहेत. हा देशाचा आणि जनतेचा अपमान आहे. आम्हाला नौटंकीसारखे शब्द वापरायचे नाहीत. पण त्यांची नौटंकी तर जनतेनं कधीच बंद केली आहे, असेही जावडेकर म्हणाले.
…तर अनेक लाटा येतील- राहुल गांधी
भारत व्हॅक्सिन कॅपिटल असूनही या देशातील लसी विदेशात निर्यात केल्या आणि इथल्या लोकांना वाऱयावर सोडले. आता पंतप्रधानांनी व्हॅक्सिन स्ट्रटेजी बनवून कोरोनाच्या लसीकरणाचा वेग वाढवावा अन्यथा देशात तिसरी, चौथी नव्हे तर कोरोनाच्या अनेक लाटा येतील असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पत्रकार परिषदेला संबोधित करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
कोरोना हा सतत बदल होणारा विषाणू असल्याने याला जेवढा वेळ दिला जाईल किंवा स्पेस दिला जाईल तेवढा तो भयानक होईल. त्यावर एकच उपाय आहे आणि ते म्हणजे लवकरात लवकर सर्व लोकांचे लसीकरण करणे. लोकांना लस जर लवकर उपलब्ध करुन दिली नाही तर कोरोना लसीच्या पकडीतून निसटून जाईल, तो बदलेल. आताचा लसीकरणाचा वेग असाच राहिला तर सर्वांचं लसीकरण पूर्ण होण्यासाठी मे 2024 साल उजाडेल. तोपर्यंत कोरोनामध्ये बदल होईल आणि या लसीचा काहीच फायदा होणार नाही. मी याबद्दल फेब्रुवारीमध्येच सरकारला सतर्क केले होते पण सरकार आणि पंतप्रधानाना कोरोना समजलाच नाही, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.