मध्यप्रदेशचे उंटचालक अडकले बेळगावात : कोरोनाने अर्थार्जनावरच घातला घाव, उंटांसह चालकांच्या पोटापाण्याचाही प्रश्न गंभीर
मनीषा सुभेदार / बेळगाव
ना डोक्मयावर छप्पर! ना विश्रांतीसाठी अंथरुण! ना हातात पैसा, ना अन्नधान्याची तरतूद, सोबतीला एक-दोन नव्हे तर आठ उंट. आपल्याबरोबरच उंटांचे पोट भरायचे कसे, हा प्रश्न पडला आहे उंटचालकांना. कोरोनाने अनेक प्रश्न निर्माण केले. परंतु, त्यामध्ये स्थलांतरितांचा, पाठीवर बिऱहाड घेऊन भ्रमंती करणाऱयांचा प्रश्न बिकट झाला आहे.
मध्यप्रदेशहून बेळगावला चार-पाच महिन्यांपूर्वी उंट घेऊन दाखल झालेल्या स्थलांतरितांची नेमकी हीच वेदना आहे. त्यांच्या हातात पैसे नाहीत, प्रशासन त्यांना जागा सोडण्यासाठी दबाव आणत आहे. परंतु, जाणार कसे, हा त्यांच्यासमोर गंभीर प्रश्न आहे.
मध्यप्रदेशहून दरमजल करत कर्नाटकातील बहुसंख्य गावांमध्ये काहीकाळ राहून हुबळी-धारवाडहून हे उंटचालक बेळगावला दाखल झाले. शहर परिसरात आणि कधी कधी ग्रामीण भागातही त्यांनी उंट फिरवून मुलांचे मनोरंजन केले व त्यातून मिळालेल्या पैशातून आपला चरितार्थ चालविला. मात्र, कोरोनाने त्यांच्या अर्थार्जनावरच मूळ घाव घातला. सध्या हातात एकही पैसा नाही आणि गावी जाताही येत नाही, अशा कात्रीत ते सापडले आहेत.
त्यांच्यापैकी गोलू, बबलू, सागर, राहुल आणि रवी हे सर्वजण परत कसे जाता येईल, या विवंचनेत आहेत. वास्तविक, एकूण नऊ जण येथे आले होते. त्यापैकी तिघे गावी परतले आहेत. दुसऱया लाटेनंतर ही मंडळी मात्र इथेच अडकून पडली आहे. त्यांना ना राहुटी उभी करता येते, ना कोठे घर भाडोत्री घेऊन राहता येते. कारण त्यांना जरी आसरा मिळाला तरी उंटांना कोठे ठेवायचे? हा मोठा प्रश्न आहे.
सध्या ही मंडळी इंडालनजीकच्या पुलाखाली आश्रयाला आहे. येथेच त्यांनी उंट बांधले आहेत. येणाऱया-जाणाऱया अनेकांनी त्यांची अवस्था पाहून काही संस्थांना कळविले. त्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्थांकडून त्यांना अन्नधान्य किंवा तयार भोजन मिळते. मात्र, ते दररोज मिळेल याची खात्री नाही. त्यामुळे ते स्वतःच येथे चूल मांडून स्वयंपाक करताना पाहायला मिळाले.
आपण जसे अन्नधान्य उपलब्ध आहे त्याप्रमाणे तजवीज करून दिवस काढत आहोत. परंतु, कोणत्याही परिस्थितीत उंटांना जगविणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही जवळपासच्या परिसरात जाऊन झाडपाला गोळा करून आणत आहोत, असे गोलूने सांगितले. या लोकांना कोरोनाची भीषणता माहीत आहे. परंतु, असे असूनही त्यांच्यापैकी कोणाकडेही मास्क नाही. मात्र, काळजी घेणे आवश्यक असल्याने ते तोंडावर कपडा बांधून वावरत आहेत.
जागा सोडण्यासाठी तगादा
लॉकडाऊनमुळे आमचे हात बांधले आहेत. प्रशासनाने आम्हाला ही जागा सोडण्यासाठी तगादा लावला आहे. पण आम्ही जायचे कोठे, या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही! आम्हाला परवानगी दिल्यास आम्ही उंटांसह येथून चालत जाण्यास तयार आहोत. परंतु, उंटांना आम्ही तेथपर्यंत कसे चालवणार, हा त्यांचा प्रश्न आहे.
मुलाबाळांना भेटून सहा महिने उलटले
स्थलांतरित आणि भटक्मया जमातीचा जगण्याचा अधिकार कोरोनाने गंभीर बनविला आहे. या उंटचालकांमध्ये फक्त पुरुषच आहेत. ते सर्वजण विवाहित असले तरी पत्नीसह त्यांची मुले-बाळे मध्यप्रदेशमध्ये आहेत. त्यांना भेटून सहा महिने होऊन गेले, असे बबलूने सांगितले. प्राण्यांच्या आधारे आपला चरितार्थ चालविणाऱया या मंडळींची अवस्था बिकट झाली आहे. त्यांच्या जाण्याची सोय झाली तर ते आपल्या गावाकडे परतू शकणार आहेत.