तीव्र स्मरणशक्ती असणे हे देवाचे वरदान समजले जाते. आपली स्मरणशक्ती तल्लख असावी असे प्रत्येकालाच वाटते. तथापि, तसे वरदान काही मोजक्या लोकांनाच लाभलेले असते. ते भाग्यवान मानले जातात. तीव्र स्मरणशक्तीमुळे अभ्यास तर अगदी कमी वेळात होतोच, पण अनेक बौद्धिक कामे अत्यंत सुकर होतात. तथापि, ही स्मरणशक्ती आपल्या नियंत्रणात असणे आवश्यक आहे. तिच्यावरील नियंत्रण सुटले तर मात्र हेच वरदान शापात रुपांतरीत होते.
अमेरिकेतील जिल प्राईस यांना असा अनुभव येत आहे. त्यांची स्मरणशक्ती इतकी तीव्र आहे, की त्यांच्या माहितीत असलेली कोणतींही बाब त्या विसरुच शकत नाहीत. त्यामुळे त्यांना बऱयाच संकटांशी दोन हात करावे लागतात. ही स्मरणशक्ती त्यांना निसर्गाचे दान म्हणून मिळालेली नाही. तर ती एका अत्यंत दुर्मिळ अशा विकारामुळे त्यांना ती प्राप्त झाली आहे. 1980 मध्ये त्यांना हायपर थीमेसिया नामक विकार जडला होता. त्यावेळी त्यांचे वय 14 वर्षांचे होते.
या आजारात स्मरणशक्ती इतकी वाढते, की, तिची कोणतीही मर्यादा रहात नाही. ज्या बाबी आपल्याला त्रास देणाऱया आणि दुःख देणाऱया असतात, त्याही स्मरणात राहतात. इतकेच नव्हे, तर सारख्या आठवत राहतात. साहजिकच अशी व्यक्ती अनेक प्रकारच्या मानसिक आजरांना बळी पडू शकते. स्मरणात राहणे हा गुण असला तरी, नको त्या बाबी नको त्या वेळेला आठवत राहणे ही अडचण ठरु शकते. प्राईस यांनी त्यांचे अनुभव कथन केले आहेत. आपले वरदान हे शाप ठरले आहे, असे त्या मानतात. त्यामुळे नको ही स्मरणशक्ती, अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यांच्या या अनियंत्रित स्मरणशक्तीचा त्रास त्यांना तर होतोच, पण त्यांच्या नातेवाईकांनाही होतो. कारण त्यांना कोणताही दिनांक सांगितला, तर त्या दिनाकांला ज्या घटना घडल्या, मग त्या चांगल्या असोत की वाईट, त्यांच्या तोंडून बाहेर पडू लागतात. याचा नातेवाईकांनाही त्रास होतो. त्यामुळे त्यांना कोणी फारसे भेटायलाच येत नाही. एकंदरीत, त्यांचे वरदान त्यांच्यासाठी शाप ठरले आहे.