लोकमान्य ग्रंथालय, वाङ्मय चर्चा मंडळ, सरस्वती वाचनालय, मंथन-शब्दगंधतर्फे ‘गझल’ कार्यक्रम उत्साहात
बेळगाव
‘फटकळांचे मौनही समजून येते
साळसुदांची भाषा कळत नाही’
असाच काहीसा भवताल सध्या आपण पाहतो आहोत. कोणत्या गोष्टीने वातावरण बदलून जाईल, दूषित होईल, हे सांगताच येत नाही. अगदीच सांगायचे तर,
‘अब नहीं बात कोई खतरेकी
अब सभीको सभीसे खतरा हैं’
असेच म्हणण्याजोगी परिस्थिती आहे. याच परिस्थितीवर नेमके भाष्य लेखक, कवी, गझलकार करतात. असेच एक गझलकार चंद्रशेखर सानेकर यांचा ‘गझलच्या उजेडात गझल’ हा कार्यक्रम गुरुवारी वरेरकर नाट्या संघामध्ये पार पडला. लोकमान्य ग्रंथालय, वाङ्मय चर्चा मंडळ, सरस्वती वाचनालय, मंथन व शब्दगंध यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला.
प्रारंभीच चंद्रशेखर म्हणाले, गझल म्हणजे भाषण नाही तर भाषा आहे. सूत्र आहे, तपशील नाही. तत्त्वज्ञान सोपे करून सांगणे म्हणजे गझल. अधिक स्पष्ट सांगायचे तर 300 पानांची कादंबरी दोन ओळीत सांगणे म्हणजे गझल. कमी शब्दात अर्थपूर्ण आशय गझल व्यक्त करते. जसे की,
‘विटेवरी उभा,
युगे झाली अठ्ठावीस
देवा माझ्या इठुला
कोणी म्हणेना खाली बस’
यामध्ये संपूर्ण कथाच आपल्याला लक्षात येते, हे गझलचे वैशिष्ट्या आहे. या कार्यक्रमात निवेदक गणेश कुलकर्णी यांनी सानेकर यांना गझल आणि एकूण लेखन प्रवास याबद्दल बोलते केले. सानेकर यांनी लता मंगेशकर यांच्या समवेत काम केल्याचा अनुभव कथन केला आणि काही गझलही सादर केल्या.
‘मौन ओशाळून जावे,
एवढे बोलू नये,
शब्द जे जपतात,
त्यांची कातडी सोलू नये’
ही व अनेक अशा अनेक गझल त्यांनी सादर केल्या. सुरेश भट हे गझलचे सम्राट मानले जातात. पण त्यांची किंमत त्यांच्यानंतरच जगाला कळाली, असे सांगताना सानेकर म्हणतात,
‘तू गेल्यावर तुझ्यावर,
हक्क आपुला सांगत होते,
तेच लोक हे जितेपणी,
तुला टाळत होते’
त्याचप्रमाणे प्रेमाच्या सामाजिक आणि अन्य गझल त्यांनी सादर केल्या आणि
‘शब्द माझ्या जाणिवेची हार आहे
मौन माझ्या जाणिवेचे सार आहे’
या गझलने आपला एकूणच लेखनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन त्यांनी स्पष्ट केला.
‘राग नुसता देत नाही,
आग शब्दांना कधी,
काळजाचा जाळही,
त्यांच्यात असला पाहिजे’
ही समाजमनाची लेखकांकडून असलेली अपेक्षाच त्यांनी व्यक्त केली.
सूत्रसंचालन आरती आपटे यांनी केले.