पुणे / प्रतिनिधी :
शत्रूशी दोन हात करणाऱ्या जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्यांबरोबर लढण्याचे बळ मिळावे, यासाठी ‘आम्ही पुणेकर’ संस्थेच्या वतीने शिवरायांचा पुतळा थेट भारत-पाकिस्तानच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे. काश्मीरच्या किरण व तगधर-टिटवाल खोऱ्यात दोन ठिकाणी नियंत्रण रेषेजवळ पुतळय़ाची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.
काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सागर दत्तात्रय डोईफोडे यांच्या पुढाकाराने मूर्ती साकारण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज अटकेपार स्मारक समितीचे प्रमुख अभयराज शिरोळे व ‘आम्ही पुणेकर’ संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी या उपक्रमासाठी नियोजन केले आहे. याबाबत बोलताना हेमंत जाधव म्हणाले, मार्च 2023 महिन्याच्या अखेरीस पुतळा बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. ‘आम्ही पुणेकर’ संस्थेतर्फे महाराष्ट्रातील शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड या किल्ल्यांवरील माती व पाणी भूमिपूजनासाठी नेण्यात येणार आहे.
अभयराज शिरोळे म्हणाले, शिवाजी महाराजांनी शत्रूंना आपल्या युद्धनीती आणि धाडसी कर्तृत्वाने पळवून लावले. त्यांच्या गनिमी काव्याचा इतर देशांनीदेखील आदर्श घेतला. सीमेवरील भारतीय जवानांना महाराजांचा आदर्श व त्याद्वारे स्फूर्ती मिळावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भारत पाकिस्तान सीमेवर स्थापन करण्यात येत आहे.