‘पृथ्वीचे आता केवळ काही दिवसच शिल्ल्क उरले आहेत. लवकरच एक अवकाशस्थ वस्तू तिच्यावर आदळणार असून ती पृथ्वीच्या अगदी जवळ पोहचली आहे. पृथीचा अंतकाळ आता केव्हाही येऊ शकतो’ अशी वृत्ते अनेकदा आपण वाचलेली अगर ऐकलेली आहेत. ती पाहून आपण काहीकाळ चिंताग्रस्त होतो. तथापि, आतापर्यंत तरी यांपैकी एकही वृत्त खरे ठरलेले नाही. (जर ते खरे ठरले, तर ते पाहण्यासाठी किती माणसे पृथ्वीवर उरतील, हाही प्रश्नच आहे.)
अवकाशस्थ वस्तू, उल्का किंवा अशनी पृथ्वीवर आदळून धोका होण्याची शक्यता खूपच कमी असते. कारण पृथ्वीभोवती वातावरण आहे आणि या अवकाशस्थ वस्तू या वातावरणात शिरल्याच, तर पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहचेपर्यंत घर्षणाने त्यांची राख होऊन जाते. वस्तू आकाराने मोठी असेल तरच ती आदळण्याची शक्यता असते. असा प्रकार पृथ्वीच्या इतिहासात दोन-तीनदाच घडला आहे.
अलिकडच्या काळात अवकाश संशोधन तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली आहे. त्यामुळे पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या वस्तूंवर लक्ष ठेवले जाते. सध्या नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने असा एक इशारा दिला असून एक खडक पृथ्वीच्या वातावरणात येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये प्रवेश करणार आहे. तो 21.47 किलोमीटर प्रतिसेकंद या वेगाने पृथ्वीकडे येत आहे. त्याचे आकारमान 830 घनमीटर असल्याचे दिसून येते. तो पृथ्वीवर आदळण्याची शक्यता कमी आहे. पण आदळल्यास मोठी हानी होऊ शकते, असेही नासाने स्पष्ट केले आहे. तो पृथ्वीच्या अगदी नजीक लवकरच येणार आहे. त्याची परस्परच दिशा वेगळी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हा इशारा नासासारख्या विश्वासार्ह संस्थेने दिल्याने ही ‘फेक न्यूज’ नाही एवढे निश्चित आहे. आता पाहू काय होते ते.