शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात युती झाली असून यापूर्वी प्रबोधनकार ठाकरे यांच्या वेबपोर्टलच्या प्रसंगीच त्यांनी आपले राजकीय मनोमिलन झाल्याचे सांगितले होते. या दोन्ही नेत्यांना त्यांच्या आजोबांचा मोठा सामाजिक आणि राजकीय वारसा आहे. ठाकरे आणि आंबेडकर ही देशाच्या राजकारणातील मोठी नावे असून वंचितच्या रुपाने महाविकास आघाडीची ताकद जरी वाढली असली तरी या युतीने शिंदे गटापेक्षा भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशीच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा शिवशक्ती-भिमशक्तीची घोषणा केली. यावेळी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका करताना ठाकरे आणि आंबेडकरांनी देशात हुकुमशाही सुरू असून या हुकुमशाहीच्या विरोधात आम्ही एकत्र आले असल्याचे सांगितले. तर शिवसेनेचे हिंदुत्व मान्य असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. आत्तापर्यंत ज्या ज्या वेळी शिवशक्ती-भिमशक्ती युती झाली त्यावेळी शिवसेनेसोबत भाजप होती आणि राज्यात युती विरूध्द आघाडी अशीच लढाई होत होती. मात्र 2019 नंतर महाराष्ट्रातील राजकारण हे बदलले ते सतत बदलताना दिसत आहे. शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर एकीकडे शिवसेना शिंदे गट-भाजप आणि जोगेंद्र कवाडे यांची पिपल्स रिपब्लिकन पार्टी तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट-काँग्रेस-राष्ट्रवादी- वंचित बहुजन आघाडी त्यामुळे अशी युती आघाडी बघता राज्याच्या राजकारणावर या युतीचे चांगलेच परिणाम होणार आहेत.
कट्टर हिंदुत्व म्हणजेच उध्दव ठाकरेंच्या भाषेत केवळ शेंडी आणि जानव्याचे हिंदुत्व सोडल्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेला प्रकाश आंबेडकर यांनीसुध्दा पाठिंबा दिला. आत्तापर्यंत दलित चळवळीतील अभ्यासकांनी तसेच पुरोगामी चळवळीतील लोकांनी शिवसेनेला हिंदुत्वावरुन नेहमीच प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाचे उदाहरण दिले, उध्दव ठाकरे यांनी मात्र आपल्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी भूमिका घेताना शिवसेनेची आक्रमक प्रतिमा बदलली. हिंदुत्वाबाबत वेळोवेळी आपली भूमिका मांडताना त्यांनी प्रसंगी भाजपला आणि विरोधकांना खडेबोल सुनावले. त्यामुळे शिवसेनेच्या या बदललेल्या भूमिकेला अनेकांनी पाठिंबा दिला जे कधी काळी शिवसेनेचे कट्टर विरोधक होते. 1970 च्या दशकात शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्ष यांचा मुंबईत रोजचा संघर्ष होत असे, या संघर्षातून शिवसेनेने आपली वेगळी ओळख निर्माण करताना परळची पोटनिवडणूक जिंकली ती सर्वार्थाने गाजली ती कृष्णा देसाई यांच्या हत्येने. मात्र नुकत्याच झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत याच कम्युनिस्ट पक्षाने मातोश्रीवर जाऊन ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यामुळे ठाकरेंच्या बदलत्या किंवा सत्य भूमिकेला राजकारणातील छोटे मोठे डावे-उजवे पक्ष पाठिंबा देताना दिसतात मात्र त्यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर किती विश्वास आहे हा मोठा प्रश्न आहे.
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्यात जरी युती झाली असली तरी वंचितला महाविकास आघाडीत घेणार का? त्यांना जागावाटपात काय स्थान देणार काँग्रेस-राष्ट्रवादी त्यांच्यासाठी जागावाटपात तडजोड करणार का? हा खरा अनुत्तरीत प्रश्न आहे. वंचित बहुजन आघाडीने 2019ला विधानसभेची निवडणूक लढवताना 288 जागांपैकी 234 जागा लढवल्या होत्या. या निवडणुकीत वंचितला 10 जागांवर दुसऱया क्रमांकाची मते मिळाली होती. बुलढाणा, अकोट, बाळापूर, अकोला पूर्व, मुर्तिजापूर, वाशिम, लोहा, कळमनुरी, परभणी, सोलापूर शहर उत्तरमध्ये वंचितला दुसऱया क्रमांकाची मते मिळाली होती. तर अनेक मतदारसंघात वंचितने तिसऱया क्रमांकाची मते मिळवली होती.
राज्यातील जवळपास 21 मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला विजयी आणि पराभूत उमेदवार यांच्या मतातील फरकाहून अधिक मतं मिळाली होती. वंचितला मिळालेल्या या मतांचा सर्वाधिक फटका हा काँग्रेस-राष्ट्रवादीला बसला होता. त्यामुळे वंचित महाविकास आघाडीत असणार की केवळ शिवसेनेचा मित्रपक्ष असणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकसभेला देखील वंचितने 47 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी वंचितला एकही जागा जिंकता आली नव्हती. वंचितची एमआयएमसोबत युती होती. त्यामुळे वंचितमुळे एमआयएमचे औरंगाबादमधील उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाले होते. वंचित बहुजन आघाडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीला लोकसभा निवडणुकीत 7 ठिकाणी फटका बसला होता. तर प्रकाश आंबेडकर सोलापूरातून उभे राहिल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांना पराभव पत्करावा लागला होता. वंचितमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जे मोठे नुकसान झाले त्यानंतर वंचितवर भाजपची बी टीम असाही आरोप करण्यात आला. आता शिवसेना आणि वंचितच्या युतीने काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर आपली पारंपारिक व्होट बँक सांभाळण्याचे मोठे आव्हान असणार आहे. कारण मधल्या काळात काँग्रेसशी युतीची बोलणी करताना प्रकाश आंबेडकर यांनी तुमचा आणि माझा दोघांचाही एक खासदार असल्याने राज्यात तुमची आणि माझी ताकद सारखी असल्याचे सांगत समान जागावाटपाचा फॉर्म्युला ठेवला होता. प्रकाश आंबेडकर यांनी नेहमीच रामदास आठवले आणि जोगेंद्र कवाडे या नेत्यापेक्षा वेगळी आणि स्पष्ट भूमिका घेतली. भावनिक राजकारण केले नाही, जेंव्हा दलित चळवळीतून दादर रेल्वे स्थानकाचे चैत्यभूमी असे नामांतर करा अशी मागणी करत आंदोलने केली जात असताना एकटय़ा, प्रकाश आंबेडकर यांनी या नामांतराला विरोध करताना, मुंबईचा सात बेटांचा ऐतिहासिक वारसा कायम राखला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली तर दुसरीकडे उध्दव ठाकरे हे देखील अशी रोखठोक भूमिका घेताना भाजपला आणि हिंदुत्वावरुन राजकारण करणाऱयांना गाईवर काय बोलता महागाईवर बोला, असे ठणकावून सांगतात. ठाकरे आणि आंबेडकर यांच्यातील हाच समान धागा आहे. त्यांनी राजकारण करताना कोणताही फायदा-तोटा बघितला नाही. जे योग्य वाटले त्यांच्याशी घरोबा केला जे अयोग्य वाटले त्यांच्याशी काडीमोड घेतला. 2019 च्या विधानसभा निवडणूकीनंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यामुळे भाजपला मोठा फटका बसला होता. भाजपने शिंदे यांच्याशी हातमिळवणी करून सत्ता मिळवली. उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपुष्टात येईल अशी शक्यता वर्तवली जात होती. आता वंचितने उद्धव ठाकरे यांना हात दिल्याने महाविकास आघाडीची ताकद वाढली की नाही माहित नाही मात्र उध्दव ठाकरे यांची ताकद नक्कीच वाढलीय. या युतीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार हे मात्र नक्की!
प्रवीण काळे