उत्तर प्रदेशातही ट्रेन पेटवली
ऑनलाईन टीम/तरुण भारत
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला आता देशभरातून विरोध होत आहे. बिहारमध्ये या योजनेला जोरदार विरोध होताना दिसत आहे. अग्निपथ योजनेच्या (Agneepath scheme) विरोधात बिहारमध्ये (Bihar) आंदोलन सुर आहे. बुधवारपासून सुरू झालेल्या या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. गुरुवारप्रमाणेच शुक्रवारीही बिहारच्या अनेक भागात हिंसक तरुणांच्या जमावाने रेल्वे गाड्या पेटवून दिल्या. रेल्वे स्थानकांचीही तोडफोड करण्यात आली. लखीसराय येथील शेकडो तरुणांनी लखीसराय रेल्वे स्थानक गाठून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. लखीसराय येथे आंदोलकांनी विक्रमशिला सुपरफास्ट ट्रेन (Vikramshila superfast train) पेटवून (train caught fire) दिली.
उत्तर प्रदेशातही बलिया जिल्ह्यात आंदोलकांनी ट्रेनला आग लावली. यानंतर रेल्वे पोलिसांनी ट्रॅकवर उतरत ही आग इतर डब्यांना लागू नये यासाठी हाताने धक्का देण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांना यशही मिळालं आणि इतर डबे सुरक्षित राहिले आहेत.
बिहारमध्ये आंदोलन हिंसक वळण लागले आहे. समस्तीपूरमध्ये आंदोलकांनी बिहार संपर्क एक्सप्रेस ट्रेन (Bihar Sampark Express train) पेटवली. यानंतर ट्रेनचे चार डबे जळून खाक झालेत. ही ट्रेन दरभंगाहून नवी दिल्लीला जात होती. या ट्रेनची प्रचंड तोडफोड करण्यात आली. ट्रेनला आग लावण्याची ही घटना समस्तीपूर-मुझफ्फरपूर रेल्वे सेक्शनच्या भोला टॉकीज रेल्वे गुमटीजवळ घडली. यासोबतच कुऱ्हाडीया स्थानकावर उभ्या असलेल्या पॅसेंजर ट्रेनलाही आंदोलकांनी आग लावली आहे. यानंतर पाटणा-दीनदयाळ उपाध्याय जंक्शन मेन लाईनवर जाळपोळ झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.
आंदोलक सरकारच्या विरोधात घोषणा देत आहेत. वैशालीतील हाजीपूर रेल्वे स्थानकावर संतप्त विद्यार्थ्यांनी तोडफोड केली. त्यामुळे पटनाच्या बिहिया स्थानकावर हल्लेखोरांनी जोरदार दगडफेक केली. आंदोलकांनी येथे स्टोअर रूमला आणि तिकीट काउंटरला आग लावली.
बिहारचे पोलीस प्रमुख राज करण नय्यर यांनी आंदोलकांची ओळख पटवण्यासाठी व्हिडीओ पाहिले जात असल्याचं सांगितलं आहे. ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.