आजरा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी हा एका विचारावर चालणारा पक्ष आहे. पण पक्षाचा विचार घेऊन काम करणारा एकही नेता जिल्हा भाजपामध्ये नसल्यामुळे आम्ही आमचा विचार कोणाकडे मांडायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्ष वाढविण्यासाठी नव्या कार्यकर्त्यांना पक्षात घेताना जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर सातत्याने अन्याय केला जात असून भाजपाकडून आजऱ्यातील भाजपाच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. भाजपाच्या सुवर्णकाळात निष्ठावंत कार्यकर्ते मात्र दुर्लक्षित असल्याचा आरोप पत्रकार बैठकीतून करण्यात आला.
जनसंघाच्या काळापासून ते आजपर्यंत कार्यरत आहोत आम्ही तालुक्यात सुरुवातीच्या व पडत्या काळात कॉंग्रेसच्या मातब्बर विरोधकांना तोंड देत पक्षाचा विचार रुजवत ध्येयवादाने व राष्ट्रवादाने प्रेरीत होऊन काम करीत होतो. जनसंघाच्या काळात कै. बाबुराव कुंभार, कै. विष्णुपंत कारेकर, आण्णा नार्वेकर, कै. शंकरराव तुरंबेकर, सुभाष नलवडे, बापू कोटकर, बापू टोपले यांनी तालुक्यातील इतर पक्षांतील मातब्बर विरोधकांना तोंड देत पक्षाचा विचार ग्रामीण भागातील गावागावात पोहचविला.
सहकार व शैक्षणिक क्षेत्रात स्वामी विवेकानंद व पं. दिनदयाळ जी यांच्या नावाने संस्था उभा करून कोल्हापूर जिल्हयात आपल्या कार्यकत्यांसाठी प्रथम सहकार उभे केले. प. महाराष्ट्रात ज्यावेळी पक्षाचा एक ही साधा ग्रा.प. सदस्य नव्हता त्यावेळी पक्षाच्या चिन्हावर जि. प. व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवून 1992 व 1997 मध्ये दोनवेळा विजय मिळवला. तालुक्याचे उपसभापती पद मिळवले. तालुक्यातील विविध संस्था, बँकामध्ये प्रतिनिधित्व मिळविले. कोणताही गट तट न स्थापन करता फक्त आणि फक्त पक्ष हाच आमचा विचार असा विचार घेऊन प्रामाणिक काम केले. अशा परिस्थितीत पक्षाला सुवर्णकाळ प्राप्त झाला. 1995, 2014 व 2019 मध्ये पक्षाची केंद्रात आणि राज्यात सत्ता आली पण दुर्दैव इतक की जिल्यातील नेत्यांना जिह्यात सत्ता टिकविता आली नाही. आपल्याच कार्यकर्त्यांचे खच्चिकरण कसे करायचे यात नेते मश्गुल झाले असल्याचा आरोप सुधीर कुंभार, डॉ. सुधीर मुंज, अरूण देसाई, मलिक बुरूड यांनी केला.
निवडणूकामध्ये व शासकीय पदाच्या निवडीतही कधीही विश्वासात न घेता आयऱ्या-गयाऱ्यांना झुकते माप दिले. केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता असून देखील तालुक्यातील विकासकामाला निधी वाटपाच्या वेळेला निष्ठावंतांना डावलून आयऱ्या-गयाऱ्यांच्या ताब्यात देऊन तालुक्यातील कार्यकत्यांना संपविण्याच काम जिल्ह्यातील नेत्यांनी केले. 2014 सांली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील याच्यांकडे पाच ते सहा प्रमुख कॅबिनेट खाती असताना देखिल निष्ठावंतांच्या पदरी निराशा पडली. पुन्हा 2022 साली राज्यात सत्ता येऊन देखील शासनाचा विकास निधी असो किंवा कार्यकत्यांना राजाश्रय मिळालाच नाही. मग काय निष्ठावंतांनी फक्त बूथ रचना कमिटी, सतरंजी उचालण्या करिता आहोत का असा प्रश्नही यावेळी करण्यात आला. आम्ही ज्या विचाराने पक्षाशी जोडले गेलो तो विचार सध्या कोणत्याही जिल्हयातील नेत्याकडे दिसत नाही त्यामुळे अशा लोकाबरोबर आमचा विचार घेऊन पक्ष म्हणून काम करणे शक्य नसल्याने आम्ही भाजपाचे कार्यकर्ते म्हणून काम थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
यावेळी आजरा नगरपंचायतीचे माजी नगरसेवक किशोर पारपोलकर, श्रीपती यादव, सुरेश देसाई, दयानंद भुसार, सचिन इंदलकर, हर्षल परूळेकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे शेकडो निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वच कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
पक्षाचे चिन्ह आणि गटांची दुकानदारी
कोल्हापूर जिल्हा भाजपामध्ये आलेल्या नव्या नेत्यांनी केवळ पक्षाचा वापर स्वत:चे गट बांधणीसाठी केला आहे. या मंडळींनी पक्षाचे चिन्ह वापरून गटांची दुकानदारी सुरू केल्याचा आरोप नाथ देसाई यांनी केला. आगामी काळात आम्ही तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूकांना सामोरे जाणार असल्याचे अरूण देसाई यांनी स्पष्ट केले.
जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा देणार
नुकत्याच झालेल्या पक्षाच्या जिल्हा कार्यकारीणी निवडीत सुधीर कुंभार यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. याबाबत प्रश्न उपस्थित केला असता निवड जाहीर झाली असली तरी अद्याप पत्र प्राप्त झालेले नाही. आम्ही पक्षाचे काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पत्र प्राप्त झाल्यानंतर मी पदाचा राजीनामा देणार असल्याचे कुंभार यांनी दिले.