बोगस रासायनिक खते ओळखण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान; बोगस खते विक्री करणाऱ्या चंदगडमधील खत विक्रेत्यावर गुन्हा दाखल; कोल्हापूर विभागीय भरारी पथकाची कारवाई
कृष्णात चौगले कोल्हापूर
बेभरवशाचा पाऊस, वेळोवेळी करावा लागणारा नैसर्गीक आपत्तींचा सामना, रासायानिक खतांसह मजूरी व मशागतीचा वाढलेला खर्च, बोगस बियाणे, शेतीमालाला हमीभावाचा अभाव आदी अनेक अडचणींनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांसमोर आता बोगस रासायानिक खते ओळखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. जिह्यात बनावट खते तयार करणाऱ्या संस्था आणि विक्रेत्यांची गर्दी झाली असून त्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. महाराष्ट्र राज्याचे गुणनियंत्रण संचालक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने चंदगड तालुक्यातील किणी येथे सुमारे 4 लाख रकमेचे 13.5 मेट्रीक टन बोगस खत जप्त केले आहे. ही कारवाई खत निर्मिती करणाऱ्या एक कारखान्यावर झाली असली तरी बोगस मिश्र खतांची निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या अद्याप मोकाट आहेत.
एकूण रासायनिक खतांपैकी सुमारे 30 ते 40 टक्के वापर हा युरीयाचा केला जातो. तर 10:26:26, 12:32:16, 18:18:10, 15:15:15, डीएपी आदी संयुक्त खतांचा 70 टक्के वापर केला जातो. या खतांच्या दरात गेल्या वर्षभरात सातत्याने वाढ होत आहे. शासनाकडून सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन दिले जात असले तरी प्रत्यक्षात जिल्हयात सेंद्रीय खतांचा वापर कमी आहे. सेंद्रीय आणि जैविक शेती करण्याची बहुतांशी शेतकऱ्यांची मानसिकता नाही. तसेच सेंद्रिय शेतीमध्ये वेळोवेळी सेंद्रिय औषध फवारणी करावी लागत असल्यामुळे शेतकरी सेंद्र्रिय शेतीकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे जिह्यामध्ये दरवर्षी सरासरी 3 लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक रासायनिक खतांचा वापर होतो. त्याचे बाजारमूल्य हे सुमारे 500 ते 550 कोटींच्या घरात आहे. पण गोणीवर छापलेल्या खतांच्या मात्रापेक्षा अतिशय कमी मात्रेच्या बोगस खताची त्याच दरात विक्री केली जात आहे. या बनावट खतांमुळे पिकांना योग्य मात्रा मिळत नाही. परिणामी अशा खतांचा वापर केलेल्या अनेक शेतकऱ्यांना आवश्यक उत्पादन मिळत नसल्याचे चित्र आहे
कोल्हापूर जिह्यात बोगस मिश्रखते व विद्राव्य खतांची विक्री करणारी खत कंपनी व विक्रेत्यावर नुकताच गुन्हा नोंद झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एका खतविक्री केंद्रामध्ये गुजरात येथील दोन कंपन्यांच्तील ‘एनपीके-18 :18:10’, ‘एनपीके 20:20:00’ 100 टक्के पाण्यात विरघळणाऱ्या विद्राव्य खतांचे नमुने विभागीय भरारी पथक प्रमुख बंडा कुंभार यांनी विश्लेषणासाठी काढले होते. त्यामध्ये ‘एनपीके’ प्रमाण अत्यंत नगन्य असल्याचे आढळले. तसेच सदर दोन्ही कंपन्यांनी महाराष्ट्र शासनाचा खतविक्री परवाना न घेता विक्री केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संबधीत दोन्ही कंपनी व खत विक्रेता यांनी खत नियंत्रण आदेश-1985 व अत्यावश्यक वस्तू अधिनियम-1955 मधील तरतूदींचा भंग केल्यामुळे खत निरीक्षक कुंभार यांनी चंदगड पोलीसांत फिर्याद दिली. त्यावरून संबंधीत दोन्ही कंपनी व चंदगड येथील खतविक्री केंद्र यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाईमध्ये राज्याचे गुणनियंत्रक संचालक विकास पाटील, तंत्र अधिकारी बंडा कुंभार यांच्यासह गुणनियंत्रण निरीक्षक प्रवीण जाधव,रामचंद्र शेळके, विभागिय पथकाचे सदस्य प्रल्हाद साळुंखे, उपविभागीय कृषि अधिकारी किरण पाटील, कृषि अधिकारी यशोदिप पोळ, सतिश कुंभार आदी कर्मचारी सहभागी होते. विभागीय भरारी पथकास कोल्हापूरचे सहसंचालक बसवराज बिराजदार व अधिक्षक कृषि अधिकारी उमेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
काढलेल्या नमुन्यात आवश्यक अन्नद्रव्यांचे प्रमाण व कंसात प्रत्यक्ष आढळलेले अन्नद्रव्याचे प्रमाण आणि बाजारमूल्य
एनपीके 18/18/10 (2.5/1.3/1.4) 1400 रूपये – 50 किलो)
एनपीके 20:20:00 (4/5.3/00) 1350 रूपये – 50 किलो
एनपीके ( विद्राव्य ) 00:52:34 (00/9/1.6) 450 रूपये – 1 किलो
सर्व संस्थांच्या मिश्रखतांची तपासणी करणे आवश्यक
जिह्यात मिश्र खते तयार करणाऱ्या अनेक सहकारी संस्था असून त्यांच्या खतांना मोठी मागणी आहे. ऊस पिकासह रब्बी, उन्हाळी आणि खरिप हंगामात या खतांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या खतांच्या गोणीवर उल्लेख केलेल्या ‘एनपीके’ च्या मात्रेवर विश्वास ठेवून शेतकरी खरेदी करतात. पण ती पिकांना किती उपयुक्त ठरतात हे काही कालावधीनंतर शेतकऱ्यांना समजते. यामध्ये बोगस खते असल्यास पिकांची वाढ होत नाही आणि हंगाम वाया जातो. त्यामुळे कृषी विभागाने मिश्र खते तयार करणाऱ्या सर्वच संस्थांच्या खतांची तपासणी करावी अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे.
चंदगडमध्ये सापडलेली बोगस खते गुजरातमधील कंपनीची
कृषी विभागाच्या भरारी पथकाने चंदगडमध्ये केलेल्या कारवाईमध्ये बनावट खते तयार करणारी कंपनी ही गुजरातमधील असल्याचे स्पष्ट झाले. मग या परराज्यातील कंपनीने राज्यातील कृषी विभागाच्या मान्यतेशिवाय आजतागायत महाराष्ट्रात किती टन बोगस रासायनिक खतांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली हा एक संशोधनाचा विषय बनला आहे. तसेच ही खते वापरल्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण ? असा प्रश्नही जाणकारांतून उपस्थित केला आहे.
शेतकऱ्यांनी ग्रेडची खात्री करून खतांची खरेदी करावी
खत विक्रेत्यांनी व शेतकऱ्यांनी खत कंपन्यांच्या परवान्याची व त्यातील खतांच्या ग्रेडची खात्री करून पक्की पावती घेऊन खतांची खरेदी करावी. येणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कोणत्याही कृषिनिविष्ठांची शंका आल्यास तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. बसवराज बिराजदार, विभागिय कृषि सहसंचालक, कोल्हापूर.