ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नवले पुलावर रविवारी रात्री झालेल्या अपघाताच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. 24 वाहनांना धडक देणाऱ्या कंटेनरचे ब्रेक फेल झाले नव्हते तर चालकाने उतारावर गाडी न्यूट्रल करून चालवल्याने हा प्रकार घडला असल्याचं समोर आलं आहे. या अपघातानंतर चालक अजूनही फरार आहे.
रविवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास खेडशिवापुर बोगद्यातून भरधाव वेगाने हा कंटेनर आला. नवले पुलावर हा कंटेनर आला असता चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनरने रस्त्यावरील तब्बल 24 वाहनांना ठोकरले. यात 13 जण गंभीर जखमी झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातात कार, रिक्षा, दुचाकी अशा वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेमुळे महामार्गावर 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.
अधिक वाचा : पुण्यात कोश्यारींविरोधात राष्ट्रवादीचं अनोखं आंदोलन
कंटेनरचे बेक फेल झाल्याचे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता या अपघाताचे खरे कारण समोर आले असून, अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मणीराम छोटेलाल यादव (रा. मध्य प्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.
तर राहुल भाऊराव जाधव (रा.वारजे), शुभम विलास डांबळे, तुषार बाळासाहेब जाधव, आनंद गोपाळ चव्हाण (रा. सहयोग नगर, पुणे), राजेंद्र देवराम दाभाडे (रा. माणिकबाग पुणे), साहू जुनेल (रा. कोंढवा पुणे), ऑस्कर लोबो (रा. कोंढवा पुणे), मधुरा संतोष कारखानीस (वय 42, रा. वनाज), चित्रांक संतोष कारखानीस (वय 8), तनीषा संतोष कारखानीस (वय 16), विदुला राहुल उतेकर (वय 45.) अनघा अजित पभुले (वय 51, रा. वडगाव पुणे), अनिता अरुण चौधरी (वय 54, रा. राहटणी चौक) अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत.