पोलिसांच्या तपासाकडे मंडणगड तालुक्याचे लक्ष; एजंटाच्या रुपाने अनेकांचे हात गुंतलेले; गुंतवणूकदारांमध्ये उदासीनता
मंडणगड प्रतिनिधी
गेल्या 6 महिन्यांपासून तालुक्यात गाजत असलेल्या एस. एम. ग्लोबलची पाळेमुळे तालुक्यात खोलवर रूजल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, आर्थिक फसवणुकीच्या या प्रकरणात अधिकृत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस प्रशासन यापुढील काळात कोणती भूमिका घेणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. तक्रारीच्या अनुषंगाने पुढे आलेली माहिती ही केवळ हिमनगाचे वरचे टोक असल्याची चर्चा आहे.
या संदर्भात तपास सुरु झाल्यावर अजूनही धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. आमिषाला बळी पडून गंतवणूक केल्याने एकीकडे गुंतवणूकदारांचे सुमारे 10 कोटी रुपये बुडीत गेल्याचा धोका निर्माण झाला असताना तगड्या कमिशनच्या मोहासाठी एजंटाची मोठी फळी कार्यरत असल्याची चर्चा पुढे आली आहे. या एजंटांमध्ये समाजातील पांढरपेशे समजले जाणारे डाॅक्टर, शासकीय अधिकारी, राजकीय प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते हेसुध्दा गुंतललेले असण्याची चर्चा पुढे येत असल्याने समोरुन खुलेपणाने व पडद्यामागून गुप्तपणे काम करणाऱ्या कमिशन एजंटांचे धाबे दणाणले आहेत. अजूनही पडद्यामागे असलेले लोक पोलीस काय करतील, या भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.
गेल्या 20 वर्षात वेगवेगळ्या आकर्षक योजनांच्या माध्यमातून फसवणुकीची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. या योजनांच्या माध्यमातून भूतकाळात तालुकावासियांची फसवणूक करणाऱ्या अनेक एजंटांनी एस. एम. ग्लोबलच्या माध्यमातून आपले उखळ यावेळीही पांढरे केल्याचे दिसले आहे. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक निरक्षरतेचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक करण्याची अनेक प्रकरणे भूतकाळात घडली असली तरी सध्या गाजत असलेल्या या प्रकरणातील गुंतवणूक व व्याप्ती अधिक आहे. यासाठी स्थानिकांच्या ओळखीचा प्रभावीपणे वापर केला गेला आहे.
गेल्या दहा वर्षात वित्तीय संस्थांची कार्यपध्दती ही बरोजगार युवकांना हाताशी धरुन आर्थिकदृष्ट्या अज्ञानी असलेल्या लोकांची फसवणूक करण्याची राहिली आहे. सावध राहून गुंतवणूक करा, अशी जागृती करणाऱ्यांनाच अपराध्याच्या पिंजऱ्यात उभे करुन एजंटांकडून धमाकावण्यातही आले आहे. बदलत्या काळात मोबाईल व इंटरनेट सुविधा ग्रामीण भागात पोहचल्याने लोकांमध्ये जागृती वाढलेली असली तरी गुन्ह्यांचे स्वरुपही बदलले आहे. आर्थिक फसवणुकीचे विद्यमान प्रकरण तालुक्याच्या इतिहासात सर्वात मोठे असल्याची साक्ष यासंदर्भात गेल्या 6 महिन्यांपासून सुरु असलेल्या चर्चेमुळे पुढे आली आहे. यात अडकलेल्या तालुक्यातील व्हाईट काॅलर बड्या धेंडांपर्यंत कायद्याचे हात कधी पोहचतील, याची वाट तालुकावासीय पाहत आहेत.
फसवणूक झालेल्यांनी पुढे यावे
फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला खऱ्या अर्थाने वाचा फुटली आहे. आर्थिक फसवणूक झालेल्यांनी कोणाचीही भीती न बाळगता पुढे येऊन कायद्याची मदत मिळवावी, अशी अपेक्षा मुख्य तक्रारदार ॲड. यश घोसाळकर यांनी शुकवारी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली.