बोरगावात वेगळ्या पद्धतीने साजरी होते नागपंचमी
अमोल फुलारी अक्कलकोट
बोरगांव हे गांव महाराष्ट्र , कर्नाटक व मराठवाड्याच्या सिमेवर असणारे एक छोटेसे गांव आहे . बोरगांव हे अक्कलकोट तालुक्यातील एक संवेदनशील गांव आहे .कोणतेही धार्मिक उत्सव हे ऐक्याने साजरे करतात ते मोहरम , गणपती किंवा पिर राजेबागसवार यात्रा असो मोठ्या उत्साह व एकदिलाने साजरा करतात .असेच एक वेगळेपणाचे प्रतिक संबोधले जाणारे सण म्हणजे श्रीयाळ शष्टी या रोजी श्रीयाळ राजाचे उत्सव व परंपरा गेल्या साडेतीनशे वर्षापासून अविरपणे बोरगांवांत जोपासत आहेत.केवळ धार्मिकतेपोटी एकमताने सर्व समाज बांधव एकत्रित येऊन हा उत्सव वंश परंपरेने आज ही भक्तिभावात व गुण्यागोविंदाने साजरा करतात. श्रीयाळ राजा हे नवसाला पावणारे , घरात गोकूळ नांदतो , आर्थिक उन्नती व प्रगती होते याचे द्योतक आहे. ज्यांना मुल बाळ होत नाहीत असे लोक श्रीयाळ राजाला नवस मागतात आणि हे नवस पुर्ण ही होतात असे जेष्ठ मंडळीकडून बोलले जाते . गावात या वर्षी लग्न झालेले किंवा ज्या घरात मुलं जन्माला आले आहे अशा घरातून स्वखूषीने खोबरे व गोडेतेल घेतले जाते . या देवाला नैवेद्य म्हणून खोबरे, गोडेतेल व नारळ हेच दिले जाते. संपूर्ण महाराष्ट्रात व सोलापूर जिल्ह्यात सोलापूर शहर व त्यानंतर बोरगांव (दे ) ता अक्कलकोट येथे श्रीयाळ राजाचे उत्सव अति उत्साहात साजरे केले जाते.
सकाळी आठ च्या सुमारास गावातील लोक एकत्रित येत वाजत – गाजत श्रीयाळ राजाची मुर्ती करण्यासाठी चिखल आणतात त्यानंतर गव्हाचे सदे ,एरंडीच्या काठ्या , अंबाडीचे वाक यापासून चार फुटाची चिखलाची मुर्ती तयार करतात. त्यानंतर त्याला खळ लावून रद्दी कागद चिकटवले जाते व त्यानंतर पांढरे ताव त्यावर लावून त्यावर नैसर्गिक रंग म्हणून हळदीमाती , कोळसा ,इंगूळ व बेंगड चिकटले जातात . राजाला चेहर्यावरील केस हे मेंढीचे केस वापरून मिशी , दाढी असे लावले जातात .चेहर्यावरील लावण्यात येणारे केस हे मानकरी धनगर समाजाच्या घरातून आणले जाते . मुखवठ्यासाठी लागणारे गाडगे हे मानकरी राजेंद्र कुंभार यांच्याकडुन आणले जाते. मुर्तीला फुलाच्या माळा – हार दांडे हे मानकरी मोहन फुलारी हे देतात तर मस्तकी गंध म्हणून अबीर – गुलाल – उद हे मानकरी बाबू आत्तार हे देतात.
श्रीयाळ राजाची मुर्ती पूर्ण होताच ती दर्शनासाठी ठेवली जाते . संपूर्ण गावातील सर्व जाती – धर्माचे लोक दर्शन घेतात त्यानंतर संध्याकाळी गौरी विसर्जन झाल्यानंतर श्रीयाळ राजाची सवाद्य व समोर तेलाच्या २५ते ३० दिवट्या लावून मिरवणूक गावातून काढली जाते . या वेळी “शिरोळ शेट्टी कोणाचा चाळीस कोटी लोकांचा ” या जय घोशाने बोरगांव नगरी दुमदुमुन जाते .वाद्य वाजवणारे , मुर्ती करणारे , फुलारी , आत्तार , कुंभार , हे स्वयंस्फुर्तीने काम करतात . संध्याकाळी मुर्तीचे विसर्जन झाल्यानंतर गावात सुखे खोबर्याचे तुकडे प्रसाद म्हणून वाटप करतात.
पिढ्यांपिढ्या मुर्ती करणारे हात – आनंद कलशेट्टी , रत्नाकर जिरगे , विरभद्र हडपद , सुरेश जिरगे , महादेव हडपद , सिद्धराम हडपद आदी …
अशी आहे श्रीयाळ राजाची आख्यायिका -इतिहास
भगवान श्री शंकरांच्या काळामध्ये, श्रीयाळ शेठ नावाचा एक राजा होता, तो भगवान शंकरांचा निःसीम भक्त होता. देवाच्या कृपेने त्याच्याकडे सर्व काही व्यवस्थित होते. त्याची चांगुणा नावाची राणी होती. आणि ह्या राजा-राणीला चिलया नावाचं एकुलतं एक बाळ होतं. श्रीयाळ-शेठ आणि चांगुणा राणी हे आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला अन्नदान करीत. त्यांच्याकडे येणारी कोणतीही व्यक्ती कधीच उपाशी जात नसे. आणि हे राजा-राणी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्त्येक व्यक्तीला जे हवं ते उपलब्ध करून देत असत. कधीही कोणाला न दुखावता आणि उपाशी न ठेवता त्यांची अन्नाची अपेक्षा पूर्ण करत असत. तर एकदा भगवान शंकरांनी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवलं. आणि एका साधूचं रूप घेऊन त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले. श्रीयाळ-शेठ राजा हा जातीने वाणी होता आणि शुद्ध शाकाहारी होता. पण ह्या साधूने “मला नरमांस हवे” अशी इच्छा बोलून दाखवली. पण श्रीयाळ शेठ राजाचा नियम होता कि दारी येणारा कोणताही वाटसरू उपाशी जाता कामा नये. मग नर-मांसाची उपलब्धता करत असताच पुन्हा एकदा साधूने मागणी केली कि मला तुझ्या बाळाचेच मांस हवे. मग मात्र चांगुणा राणीवर दुःखाचा डोंगर पसरतो. पण तरीही अन्नदानाचा नियम मोडू नये आणि आपल्या घरून कोणी उपाशी जाऊ नये यासाठी मुलाचं धड आणि शीर वेगळं करते. एकुलत्या एक बाळाची आठवण म्हणून बाळाचं कांडण केलेलं शीर ती बाजूला काढून ठेवते. आणि मांस शिजवते ते फक्त धडाचं. जेव्हा ते साधू पुढे आणलं जातं तेव्हा त्याच्या लक्षात येतं कि चांगुणा राणीने शीर बाजूला काढून ठेवलं आहे आणि ताटामध्ये वाढून आणलेलं मांस हे फक्त धडाचं आहे. पुन्हा एकदा क्रोधीत होऊन साधू उठू लागतो कि तुम्ही माझी फसवणूक करीत आहात म्हणून. पण मग श्रीयाळ-शेठ राजा आणि राणी त्या साधूचे पाय धरतात आणि माफी मागतात. आणि करुन भाकतात श्री शंकराला कि भगवंता आता आमची किती परीक्षा पाहणार आहेस. मग चांगुणा राणी जाउन ते शीर कांडण करून शिजउन साधूला आणून देते. आणि मग राजा-राणी बोलतात कि हे साधू आता तरी आमचं सत्त्व राख आणि हे भोजन ग्रहण कर. मग साधू (भगवान शंकर) त्यांचा त्याग पाहून प्रसन्न होतात. आणि मग राजा-राणीला सांगतात कि मी प्रसन्न झालो आहे तुमची भक्ती पाहून. आणि चांगुणेला विचारतात कि तू मला हव ते शिजऊन घातलस, तुला काय हवा तो इच्छित वर माग. ती बिचारी आई पोटचं एकुलतं एक बाळ गेल्याच्या विरहाने हंबरडा फोडते आणि चिलया बाळाला मोठमोठ्याने हाका मारते, साधूला म्हणते कि लोक आता मला वांज म्हणतील आणि हा कलंक मला लागेल. माझा हा कलंक तू धुऊन टाकू शकतोस का? ….पाहते तर काय… चिलया बाळ समोरून धावत येते आणि आईला बिलगते. मग भगवान शंकर खरं रूप धारण करतात आणि त्या दोघांना दर्शन देतात. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो. श्रीयाळ-शेठ राजा आणि चांगुणा राणी साक्षात भगवंतांच्या दर्शनाने धन्य पावतात. भगवान शंकर मग सांगतात कि तुमची परीक्षा घ्यायला मी आलो होतो आणि तुमची भक्ती अगाध आहे. अशा या भगवान शंकर भक्ताचं म्हणजेच श्रीयाळ शेठ राजाचं राज्य फक्त दीड घटकांचं होतं. म्हणून ह्या राजाला औट घटकेचा राजा असं संबोधलं जातं.