नंदिहळ्ळी परिसरातील शेतकरी आंदोलनाच्या तयारीत : विरोध असूनही रेल्वेमार्ग होणार?
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गासाठी गेल्या तीन वर्षांपासून सर्व्हे सुरू होता. या रेल्वेमार्गाचा दोनवेळा सर्व्हे करण्यात आला. शेतकऱयांनी त्याला जोरदार विरोध केला आहे. काही शेतकऱयांनी न्यायालयात धावही घेतली आहे. असे असताना नंदिहळ्ळी परिसरात रेल्वेरुळाखाली घालण्यात येणारे स्लीपर (काँक्रिटचे खांब) टाकण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली असून शेतकऱयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
रेल्वेमार्ग करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र शेतकऱयांनी या रेल्वेमार्गाऐवजी काही पर्यायी मार्ग सूचविले होते. मात्र त्याबाबत कोणताही निर्णय अद्याप तरी घेतला नाही. राजकीय व्यक्तींच्या जागा वाचविण्यासाठी शेतकऱयांच्या सुपीक जमिनीतून हा रेल्वेमार्ग केला जात आहे, असा आरोप शेतकरी करत आहेत. दोनवेळा सर्व्हे झाला. त्यावेळी शेतकऱयांनी रेल्वेरुळासाठी करण्यात येणारा खर्च तसेच अंतर कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग सूचविला होता. मात्र त्यामार्गाऐवजी दुसराच मार्ग निवडण्यात आला आहे.
आता रेल्वेमार्गासाठी हे खांब टाकण्यात आल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. नंदिहळ्ळी, गर्लगुंजी परिसरातील शेतकऱयांनी या रेल्वेमार्गाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्याठिकाणी हा खटला प्रलंबित आहे. असे असताना अचानकपणे रेल्वेचे स्पीलर ठेवल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. रेल्वेमार्ग करा, त्याला आमचा विरोध नाही. मात्र सुपीक जमिनीऐवजी खडकाळ जमिनीतून मार्ग करण्याची मागणी होत आहे.