सरवडे प्रतिनिधी
बिद्री साखर कारखान्याची निवडणूक वेळेत व्हावी यासाठी कारखाना प्रशासनाने संपूर्ण तयारी करून संबधित विभागाकडे पाठपुरावा देखील सुरु होता. मात्र कारखाना कार्यक्षेत्रात जनाधार मिळणार नाही हे लक्षात येताच सतेच्या जोरावर आमदार प्रकाश आबिटकर यांनी नियमबाह्य शासकीय आदेश काढून निवडणूक पुढे ढकलली आहे. या आदेशाच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत अशी माहिती बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, कारखान्याची निवडणूक वेळेत होण्यासाठी आम्ही तयारी ठेवली मात्र निवडणूक प्रक्रिया लांबण्याच्य दृष्टीने आमदार आबीटकर यांनी सातत्याने प्रयत्न केले.तर सत्तेचा गैरवापर करुन केवळ बिद्री साखर कारखान्याच्या निवडणूकीला स्थगिती आणण्याचे काम केले. उत्कृष्ट कारभार आणि उच्चांकी दरामुळे आमच्यावर सभासदांचा विश्वास निर्माण झाला आहे. याउलट आबिटकरांना सभासदांतून स्थान मिळेनासे झाले आहे . हे ओळखून आकसातून निवडणुकीला स्थगिती आणली आहे. त्यांनी केलेला हा प्रकार म्हणजे आजचे मरण उद्यावर ढकलले आहे. जिल्ह्यात अनेक संस्थाच्या निवडणूका लागलेल्या असताना केवळ बिद्रीची निवडणूक थांबवली जाते हे कायदाबाह्य आहे. याबाबत उच्च न्यायालयात पिटीशन दाखल केले आहे. न्यायालयात आम्हाला न्याय मिळेलच परंतु तिथे न्याय न मिळाल्यास जनतेच्या कोर्टात निश्चित न्याय मिळेल असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, केवळ बिद्रीच्या सत्तेत येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आबिटकर यांनी गेल्या दशकामध्ये चांगल्या उपक्रमांना विरोध केला आहे. कारखान्याने हाती घेतलेल्या इथेनॉल प्रकल्पाचे इरादापत्र आमदारांच्या सांगण्यावरून थांबविण्यात आले आहे. एखादा प्रकल्प लांबल्यास कोट्यावधी रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड कारखान्याला पर्यायाने सभासदांना सोसावा लागतो. कारखान्याच्या हिताच्या गप्पा मारणाऱ्या आमदारांनी सभासदांच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून संस्थेला सहकार्य करणे गरजेचे होते.मात्र त्यांनी संस्था अडचणीत कशी येईल यासाठी सातत्याने प्रयत्न केले. हा साखर कारखाना माझ्या मालकीचा नसून बिद्री हे तमाम सभासदांचे विकास मंदिर आहे. या मंदिरावर दगड मारण्याचे काम विद्यमान आमदारांनी करु नये असा सल्ला त्यांनी दिला.
हिंमत असेल तर मैदानात या … !
कारखान्याची निवडणूक लढवल्यास यश मिळणार नाही हे ओळखून राज्यातील सतेचा गैरवापर करुन विविध मार्गांनी आडकाठीने संस्थेला अडचणीत आणण्याचे काम आमदार आबिटकर करीत आहेत. मात्र त्यांच्यात लढण्याची हिंमत असेल तर निवडणूक रिंगणात उतरावे असे आव्हान के पी पाटील यांनी यावेळी केले.