प्रतिनिधी /पणजी
दोनापावला जेटीवर पर्यटकांचा मनमानी कारभार सुरु असून, हा कारभार जीवावर बेतला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. सरकारने याची त्वरीत दखल घ्यावी. अशी मागणी निष्ठावंत गोमंतकीय जनतेकडून होत आहे. गोव्यात येणारे पर्यटक समुद्रात, नदीत बुडून मरतात नंतर त्याची बातमी राष्ट्रीय स्तरावर प्रसिध्द होते आणि गोव्याचे नाव बदनाम होते. त्याबाबत पाऊले उचलावी अशीही मागणी होत आहे.
दोनापावला जेटी पर्यटकांना खूली केली असली तरी जेटीच्या काही भागाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे काम झालेल्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास मनाई आहे. त्याबाबतच फलकही जेटीवर लावण्यात आले आहे. पर्यटक मात्र त्याची काळजी न करता केवळ सेल्फी काढण्यासाठी जेटीवर बॅरीगेट ओलांडून धोक्याच्या ठिकाणी जात आहे. एखादी अपघात होऊन पर्यटक मेल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे.
जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत म्हणजे 11 महिन्यात सुमारे 35हून अधिक पर्यटक बुडून मेल्याच्या घटना घडल्या आहे. यापैकी अधिकाधिक पर्यटक हे त्यांच्या बेशिस्तमुळे किंवा नियमांचे पालन न केल्यामुळे त्यांना मृत्यूला समोरे जावे लागले.
सुमुद्रात पाण्याची पातळी वाढू लागली की पर्यटकांना समुद्रात जाण्यास मनाई केली जाते. मात्र पर्यटकांकडून त्याचे पालन केले जात नाही. रात्री अपरात्री किंवा भल्या पहाटे समुद्रात आंगोळ करण्यासाठी गेलेल्या पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. समुद्राची माहिती नसते आणि केवळ मजा म्हणून कोणत्याही गोष्टीची पर्वा न करतात समुद्रात आंघोळ करण्यासाठी उतरतात आणि नंतर मृत्यूला समोरे जातात. अनेक पर्यटकांना गोव्यातील समुद्र किनाऱयावर किंवा पाण्यात जाऊन सेल्फी काढण्याची खूप हौस असते. धोकादायक ठिकाणांवर फलक लावलेले असतात त्याची पर्वा न करतात केवळ सेल्फी काढण्याच्या नादात प्राण गमावतात असे अनेक प्रकार घडत असतानाही पर्यटक नियमांचे पालन करीत नाही. ही एक चिंतेची बाब आहे.