वृत्तसंस्था/ रांची
विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील रविवारी येथे झालेल्या ई गटातील सामन्यात शुभम रोहिला आणि रवि चौहान यांच्या शानदार शतकांच्या जोरावर सेनादलाने बलाढय़ मुंबईचा 8 गडय़ांनी पराभव केला.
या सामन्यात सेनादलाने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. मुंबईने 50 षटकात 9 बाद 264 धावा जमविल्या. त्यानंतर सेनादलाने दोन गडय़ांच्या मोबदल्यात विजयाचे उद्दिष्ट गाठत मुंबईवर आठ गडय़ांनी विजय मिळवला. मुंबईच्या डावामध्ये सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वालने 122 चेंडूत 13 चौकारासह 104, मुलानीने 58 चेंडूत 5 चौकारासह 48, कर्णधार रहाणेने 67 चेंडूत 3 चौकारासह 43 धावा जमवल्या. जैस्वाल आणि राणे यांनी तिसऱया गडय़ासाठी 105 धावांची भागीदारी केली. मुलानी समवेत जैस्वालने सहाव्या गडय़ासाठी 47 धावांची भर घातली. तनुष कोटियानने 16 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारासह 26 धावा जमवल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना सेनादलाची सलामीची जोडी शुभम रोहिला आणि रवि चौहाण यांनी 231 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. चौहानने 1 षटकार आणि 11 चौकारासह 100 धावा झळकवल्या. रोहिलाने 119 चेंडूत 4 षटकार आणि 15 चौकारासह 135 धावा झळकवल्या. सेनादलाने 45.3 षटकात 2 बाद 266 धावा जमवत विजय नोंदवला. या सामन्यात सेनादलाला 4 गुण मिळाले.
अन्य एका सामन्यात बंगालने मिझोरामचा 9 गडय़ांनी पराभव केला. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना मिझोरामचा डाव 21.2 षटकात 57 धावा आटोपला. त्यानंतर बंगालने 6.2 षटकात 1 बाद 59 धावा जमवल्या. बंगालला या सामन्यात 4 गुण मिळाले. या स्पर्धेतील झालेल्या दुसऱया एका सामन्यात रेल्वेने पाँडिचेरीचा तीन गडय़ांनी पराभव केल. या सामन्यात मिझोरामने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 289 धावा जमवल्या. पारस डोक्राने 102 तर अरुण कार्तिकने 80 धावा केल्या. त्यानंतर रेल्वेने 49.1 षटकात 7 बाद 290 धावा जमवत हा सामना जिंकला. रेल्वे संघातर्फे शिवम चौधरीने 115, उपेंद्र यादवने 61 आणि शुभम चौबेने नाबाद 36 धावा जमवल्या.
संक्षिप्त धावफलक ः मुंबई 50 षटकात 9 बाद 264 (जैस्वाल 104, मुलानी 48, रहाणे 43), सेनादल 45.3 षटकात 2 बाद 266 (रोहिला 135, रवि चौहान 100).