नोंदणी महानगरपालिकेत; दाखला सेवा केंद्रात
प्रतिनिधी /बेळगाव
ग्रामवन सह सेवाकेंद्रांवर जन्म मृत्यू दाखले देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे त्यामुळे महापालिकेने दाखले देण्याची सेवा बंद केली असून, नागरिकांची गैरसोय होत आहे. महापालिकेत नाव दाखल करून जन्म दाखला घेण्यासाठी जनसेवा केंद्रावर जावे लागत आहे. परिणामी नागरिकांना धावपळ करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेत जन्म व मृत्यू दाखले देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र अलिकडे महापालिकेने दाखले देण्याची सेवा पूर्णपणे बंद ठेवली असून, केवळ नावनोंदणी आणि चुकीची दुरूस्ती करण्याची सेवा कार्यरत ठेवली आहे. पण याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असुन, दाखले घेण्यासाठी महापालिकेत आलेल्या नागरिकांना धावपळ करावी लागत आहे.
पहिल्यांदाच जन्मदाखला घेत असल्यास बाळाचे नाव नोंद करण्यासाठी महापालिकेत यावे लागते. नाव नोंद केल्याखेरीज सेवा केंद्रांवर जन्म दाखला उपलब्ध होत नाही. त्यामुळे नागरिक महापालिकेत जाऊन जन्म दाखल्यासाठी नाव नोंदणी करीत आहेत.
नागरिक सेवा केंद्राच्या शोधात
त्या ठिकाणी केवळ नाव नोंदणी करून दाखला क्रमांक देण्यात येत आहे. मात्र जन्मदाखला देण्यास टाळाटाळ केली जात आहे. दाखला घेण्यासाठी सेवा केंद्रावर जाण्याची सूचना करण्यात येत आहे. तसेच चुकीची दुरूस्ती केल्यानंतरही जन्म व मृत्यू दाखला देण्यास टाळाटाळ केली जात आहे. परिणामी महापालिकेतून उपलब्ध झालेला जन्मदाखला नोंद क्रमांक घेऊन सेवाकेंद्राच्या शोधात नागरिकांना भटकावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. महापालिकेत जन्म मृत्यू दाखले घेण्यासाठी येणाऱया नागरिकांना पुन्हा शहरात यावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेत येणाऱया नागरिकांना जन्म दाखले उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी होत आहे.