किरण ठाकुर यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही : मुख्यमंत्री शिंदे सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर
सिंधुदुर्ग : गोव्यात नव्याने सुरू झालेल्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा लाभ बेळगाव आणि कोल्हापूरवासियांनाही व्हावा व येथील व्यापाराला चालना मिळावी, यासाठी बेळगाव व्हाया सिंधुदुर्ग मोपापर्यंत चौपदरी महामार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक आणि ‘लोकमान्य’चे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आले असता किरण ठाकुर यांनी त्यांची सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथे भेट घेऊन त्यांच्याशी या संदर्भात विस्तृत चर्चा केली. बेळगाव ते मोपा हा चौपदरी द्रुतगती मार्ग करायचा झाल्यास फक्त 15 किलोमीटर तेवढा मार्ग कर्नाटकमध्ये येतो. तर उर्वरित 100 किलोमीटर मार्ग हा महाराष्ट्राच्या हद्दीत येतो. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने यात पुढाकार घेऊन हा मार्ग पूर्णत्वास नेल्यास बेळगाव ते मोपा विमानतळ आणि कोल्हापूर ते मोपा हे अंतर अवघ्या दोन तासात गाठता येणे शक्य आहे. त्याचा फायदा कोल्हापूर आणि बेळगाव येथील व्यापारी पेठांना होऊ शकतो, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले. त्यामुळे सिंधुदुर्गच्या विकासातही भर पडेल, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी यावर निश्चित सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन ठाकुर यांना दिले.
शिक्षण संस्थांना तालुक्याचे बंधन नको!
बेळगाव-मोपा मार्गाबरोबरच त्यांनी आणखी दोन मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या. शिक्षण क्षेत्रामध्ये विविध अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना परवानगी देताना त्यांना तालुक्यांच्या बंधनात अडकवू नका, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. एका तालुक्यामध्ये परवानगी देण्यात आलेले महाविद्यालय जर काही कारणास्तव अन्य तालुक्यात हलवायचे असेल, तर शासन त्याला परवानगी देत नाही. हे सर्वस्वी चुकीचे आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालयांना, विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सुविधा देता येणे कठीण बनते. त्यामुळे शिक्षण खात्याच्या या जाचक अटींचा गांभीर्याने विचार व्हावा व ही अट तात्काळ दूर करावी, अशी लेखी मागणीही त्यांनी केली.
उद्योगांना तात्काळ वीजपुरवठा करावा!
सिंधुदुर्गात छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायांना चालना मिळावी व त्यातून या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध व्हावा, असं वाटत असेल तर शासनाने उद्योगांना आवश्यकतेनुसार तात्काळ वीजपुरवठा करावा, अशी मागणीही ठाकुर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. या जिल्ह्यात उद्योग व्यवसाय येण्यास तयार आहेत. पण त्यांना हवा असलेला वीजपुरवठा योग्य वेळेत उपलब्ध होत नाही. पर्यायाने या जिल्ह्यात उद्योजक इच्छा असूनही येऊ पाहत नाहीत. त्याचाही गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.
सीमावासियांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले
सीमावासियांच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधताना किरण ठाकुर यांनी महाराष्ट्राच्या भूमिकेबाबत मुख्यमंत्र्यांकडे काहीशी नाराजी व्यक्त केली. ज्यावेळी कर्नाटकला पाण्याची आवश्यकता असते, त्यावेळी महाराष्ट्र माणुसकी धर्म पाळून कर्नाटकला तात्काळ पाणी पुरवतो. या उलट सीमाभागातील मराठी बांधवांवर कन्नडसक्ती नको, अशी मागणी मराठी बांधवांनी केली, तर कर्नाटक सरकार ती मागणी धुडकावून लावते. कर्नाटक जर माणुसकीचा धर्म पाळत नसेल, तर आपण माणुसकीला का धरून राहता? हा मराठी बांधवांवर अन्याय नव्हे का, असा सवालही ठाकुर यांनी केला. या प्रसंगी केंद्रीय लघु, सुक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते.