ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पक्षातील नेत्यांनीच ‘हायजॅक’ केली आहे. यात्रेवर नेत्यांचा कब्जा असून, कार्यकर्त्यांना ते राहुल गांधी यांना भेटू देत नाहीत. परिणामी या यात्रेमुळे त्यांचा पक्ष वाढण्याच्या ऐवजी कमकुवत होत आहे. इतर पक्षांतील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये येण्याऐवजी काँग्रेसमधून कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी म्हटले आहे.
ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर पक्षातील नेत्यांनीच कब्जा केल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. नेते कार्यकर्त्यांना राहुल गांधींना भेटू देत नाहीत. त्यामुळे पक्ष वाढण्याच्या ऐवजी कमकुवत होत आहे. इतर पक्षातील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये येण्याऐवजी काँग्रेसमधील कार्यकर्तेच भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. नंदूरबारच्या काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी आजच भाजपामध्ये प्रवेश केला. 2024 ची आगामी निवडणूक येईपर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करतील.
अधिक वाचा : स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम नेगी यांचे निधन
भाजप आगामी निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत युती करून लढवेल. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारचे काम आणि पक्षाच्या संघटनात्मक ताकदीच्या जोरावर आम्ही यश मिळवू. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात 48 पैकी किमान 45 जागा व विधानसभा निवडणुकीत किमान 200 जागांवर आम्ही यशस्वी होऊ. आमच्या विरोधात तीनही पक्ष एकत्र आले तरी आम्ही विजय मिळवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.