योगदान नसलेल्यांना संचालक मंडळात संधी
Rayat Educatin, Satara : सातारा येथे रयत शिक्षण संस्था (Rayat Education Society) स्थापन करण्यात राजघराण्याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे राजघराण्यातील एक सदस्य संस्थेच्या संचालक मंडळावर घ्यावा अशी आपण मागणी केली होती. प्रत्यक्षात तसे घडले नाही. ज्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली त्या कर्मवीर भाऊराव पाटील ( Bhaurao Patil ) यांच्या पश्चात रयत शिक्षण संस्थेत मोठे राजकारण सुरू असून संस्थेसाठी कोणतेही योगदान नसलेल्यांना संचालक मंडळात काम करण्याची संधी दिली आहे असे मत खा. उदयनराजे भोसले ( MP Udayanraje Bhosale) यांनी व्यक्त केले.
सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलनास बसलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी आज खा. उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली. त्यानंतर ते प्रसिद्ध माध्यमांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, सत्तेचे विकेंद्रीकरण करणे हा लोकशाहीचा मूळ ढाचा आहे. मात्र रयत शिक्षण संस्थेचे सर्वोसर्वा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पश्चात संस्थेमध्ये फार मोठे राजकारण सुरू झाले. मुठभर लोक निर्णय घेऊ लागले. संस्था स्थापन करण्यापाठीमागे कर्मवीर भाऊराव पाटील यांची मूळ कल्पना अत्यंत चांगली होती. उपेक्षित, बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली करण्यासाठी त्यांनी संस्थेची स्थापना केली. संस्थेची स्थापना झाल्यानंतर घटनेत राज्याचा मुख्यमंत्री हा संस्थेचा अध्यक्ष असावा असा उल्लेख असतानाही आजपर्यंत तसे घडले नाही. मुळात संस्थेला शासनाकडून अनुदान मिळते. त्यामुळे शासनाने संस्थेमध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांची विचारधारा संस्थेने जोपासली असती तर आज कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली नसती असेही त्यांनी यावेळी नमूद केले. माझ्या आईचे वडील म्हणजे माझ्या आजोबांनी त्यांच्या भागात मराठा विद्या प्रसारक मंडळ नावाने शैक्षणिक संस्था सुरू केली. आज ती अत्यंत उत्तमरीत्या सुरू आहे असे सांगून ते पुढे म्हणाले, संस्था कोण चालवते हे महत्त्वाचे नाही ती कशी चालवली जाते याला खूप महत्त्व आहे. सत्तेत कोण आहे हे न पाहता संस्था चालवता आली पाहिजे. रयत शिक्षण संस्थेसाठी ज्यांचे काडीचेही योगदान नाही, त्यांना संचालक मंडळावर काम करण्याची संधी दिली आहे. मात्र संस्था स्थापन करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांना मात्र संधी दिली गेली नाही. आज वार्षिक सभेमध्ये उल्लेख करण्यात पुरतीच संस्था राहिली असून बाकी मात्र मोठ्या प्रमाणावर राजकारण सुरू आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.