प्रतिनिधी /कुडचडे
गेली आठ वर्षे उर्वरित देशाबरोबर गोव्यात कोणत्या प्रकारे विकास झालेला आहे ते सर्वांना माहीत आहे. कधी कोणी विचार सुद्धा केला नव्हता अशा पद्धतीच्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. तसेच काही पूल, बगलरस्ते पूर्ण झालेले आहेत. काहींचे काम सुरू आहे. अनेक कामे झालेली आहेत व यापुढे ती अधिक चांगल्या प्रकारे व कमी वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे. तसेच आरोग्याच्या दृष्टीने, महिलांच्या विकासासाठी जी पावले सरकारने उचललेली आहेत त्यांना यश येताना दिसू लागला आहे. दिव्यांगांसाठीही वेगवेगळ्या प्रकारे कार्य करण्यात येत आहे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले.
कुडचडे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गोव्यातील 40 ही मतदारसंघांत विविध दिवशी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले असून कुडचडे मतदारसंघात आज 7 रोजी संध्याकाळी रवींद्र भवनमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील 15 दिवस संपूर्ण मतदारसंघात विविध कार्यक्रम आयोजिण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी कुडचडे मंडळ अध्यक्ष विश्वास सावंत, सचिव राजेंद्र वस्त, महिला मोर्चा अध्यक्षा जस्मिन ब्रागाझा, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ गावस देसाई हजर होते.