महिनाभरात 20 हून अधिक घरफोड्या : स्थानिक तसेच परप्रांतीय गुन्हेगारांचा सहभाग : गुन्हेगारी टोळ्या सक्रिय
बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्यात गुन्हेगारांनी पोलीस यंत्रणेसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे केले आहे. बंद घरांना लक्ष्य बनविण्यात येत असून त्यामुळे घराला कुलूप लावून बाजारात जाणेही धोक्याचे ठरत आहे. केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. केवळ महिनाभरात 20 हून अधिक चोऱ्या, घरफोड्या घडल्या आहेत. यापैकी एकाही प्रकरणाचा छडा लावण्यात पोलीस दलाला यश आलेले नाही. सध्याचा गुन्हेगारीचा आलेख लक्षात घेता केवळ स्थानिक गुन्हेगारच नव्हे तर परप्रांतीय गुन्हेगारी टोळ्याही बेळगाव परिसरात सक्रिय असल्याचा संशय बळावत चालला आहे. चोऱ्या, घरफोड्या करण्यासाठी गुन्हेगार बंद घरांना कसे शोधतात? पाळत कशी ठेवली जाते? चोरीनंतर दागिने, मुद्देमालाची विल्हेवाट कशी लावतात? यामध्ये महिला व मुलांचाही समावेश आहे का? आदी प्रश्नांची उत्तरे शोधली तरच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळता येणार आहेत. मंगळवार दि. 23 मे रोजी रामतीर्थनगर व रुक्मिणीनगर परिसरात दोन घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. रुक्मिणीनगर येथील महाबुबी पठाण व रामतीर्थनगर येथील शोभा पुजार यांच्या घरी चोरीचा प्रकार घडला आहे.
कॅम्प पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील महालक्ष्मीनगर-लक्ष्मी टेकडी परिसरातील तीन घरे फोडल्याचे एकाच दिवशी उघडकीस आले. महालक्ष्मीनगर येथील मारुती नाईक, दयानंद माने व बसवराज नंदी यांच्या बंद घरांचे कडीकोयंडे तोडून सुमारे दहा लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज लांबविण्यात आला आहे. मुत्नाळ, ता. बेळगाव येथील गंगाप्पा अळगुंडी यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून 7 तोळे 7 ग्रॅमचे दागिने व 12 हजार रुपयांची रोख रक्कम पळविण्यात आली आहे. तारिहाळ, बस्तवाड, के. के. कोप्प परिसरातही चोरीच्या घटना घडल्या आहेत. मच्छे, पिरनवाडी, काकती येथेही चोऱ्या झाल्या आहेत. शनिवारी पोलीस यंत्रणा पारंपरिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक बंदोबस्तात गुंतली होती. याच दिवशी अनेक ठिकाणी घरफोड्या झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे साहजिकच पोलिसांची डोकेदुखीही वाढली आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी गेल्याच आठवड्यात बेळगावकरांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले होते. चोऱ्या, घरफोड्या रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनीही खबरदारी घेतली तर चोऱ्या, घरफोड्या रोखता येणार आहेत, असे आवाहन त्यांनी केले होते.
प्रत्येक गुन्हेगाराची गुन्हेगारीची पद्धत असते वेगळी
एखाद्या गुन्हेगारी प्रकरणानंतर त्याचा छडा लावण्यासाठी, गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात येते. घटनास्थळावर आढळून येणाऱ्या ठशांच्या नमुन्यांवरून या गुन्ह्यांमध्ये कोणते गुन्हेगार कार्यरत आहेत, याचा माग काढला जातो. प्रत्येक गुन्हेगाराची गुन्हेगारीची पद्धत वेगळी असते. कोणी बंद घरांचे कडीकोयंडे तोडून घरात प्रवेश करतात तर आणखी कोणी पाठीमागील दरवाजा फोडून चोरी करतो. काही गुन्हेगार खिडकीचे गज कापून किंवा ग्रील काढून घरात प्रवेश मिळवतात. गुन्हेगारीच्या पद्धतीवरून त्यांचा माग काढला जातो. सध्या बेळगाव शहर व तालुक्यातील गुन्हेगारीच्या घटना लक्षात घेता तपास यंत्रणा चक्रावून गेली आहे. यापूर्वी अनेक वेळा चोऱ्या, घरफोड्या करणारी अल्पवयीन मुले व महिलांनाही अटक झाली आहे. बेळगाव परिसरात सक्रिय असणाऱ्या अनेक आंतरराज्य गुन्हेगारांना कोल्हापूरसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अटक झाली आहे. तरीही नवनवीन गुन्हेगार बेळगावात आपली करामत दाखवत आहेत. विधानसभा निवडणूक, शिवजयंती चित्ररथ मिरवणूक बंदोबस्त संपला आहे. आता तरी पोलीस यंत्रणेने बेळगावकरांना हैराण करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.
घराच्या दुर्लक्षित दर्शनी भागामुळे आमंत्रण
गुन्हेगार चोरीसाठी एखादे घर कसे निवडतात, याची माहिती तपास अधिकारी अनेक वेळा गुन्हेगारांकडून वदवून घेतात. ज्या घरासमोर रात्रीचा लाईट सुरू नसतो. ज्या घरासमोर कपडे वाळत घातलेले नसतात. गेटवर दोन-तीन दिवसांची वृत्तपत्रे पडून असतात. टपालही धूळ खात पडलेले असते, अशीच घरे चोरीसाठी निवडली जातात. कारण, या घरातील मंडळी परगावी गेली आहेत, हे एक-दोन दिवसांच्या निरीक्षणावरून गुन्हेगारांच्या लक्षात येते. बाजारात जाणाऱ्यांवरही पाळत ठेवली जाते. एखादी व्यक्ती आपल्या घराला कुलूप लावून बाजारात जाऊन येईपर्यंत त्याच्या घरात चोरी झालेली असते. अनेक महिला पाळत ठेवतात व बंद घरांविषयी गुन्हेगारांना माहिती देतात. आजवरच्या अनेक चोरी प्रकरणात गुन्हेगारांची धरपकड केल्यानंतर त्यांच्याकडून याबाबतची कबुली दिली गेली आहे. दरवाजाला लावलेले कुलूपही गुन्हेगारांना खूप काही सांगून जाते. म्हणून सेंट्रल लॉक व्यवस्था करा, घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरा बसवा, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.