पुणे / प्रतिनिधी :
न्यायमूर्ती रानडे यांनी शास्त्रीय व राष्ट्रीय दृष्टीकोन ठेवतानाच व्यक्तिकेंद्रित इतिहासाची मांडणी टाळली. इतिहास हा वस्तुनिष्ठपणेच दिला पाहिजे. भगवे, हिरवे, लाल असे कोणतेही चष्मे वापरणे, हे इतिहासाबरोबर स्वत:वरही अन्याय करण्यासारखे आहे, याची जाणीव करून देतानाच इतिहासाची परखड चिकित्सा व समतोल मांडणी करण्याची दृष्टी रानडे यांनी दिली, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजा दीक्षित यांनी रविवारी येथे काढले. सार्वजनिक जीवनातील नैतिकतेबाबत आग्रही असलेल्या रानडे यांच्या विचारांतून आजच्या राजकारण्यांनी व राजकीय पक्षांनी बोध घेतला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘इतिहास शिक्षक महामंडळ, महाराष्ट्र’च्या वतीने ख्यातनाम इतिहास अभ्यासक प्रा. ज. वि. नाईक पुरस्कृत ‘न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व्याख्यानमाले’त व्याख्यान देताना प्रा. दीक्षित बोलत होते. अध्यक्षस्थानी भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत होते. या वेळी इतिहास शिक्षक महामंडळाचे कार्याध्यक्ष बापूसाहेब शिंदे, इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे आदी उपस्थित होते. इतिहास शिक्षक पुरस्कारांचेही या वेळी वितरण करण्यात आले.
प्रा. दीक्षित म्हणाले, इतिहासाच्या समग्र प्रक्रियेकडे न्यायमूर्ती रानडे हे शास्त्रीय दृष्टीने पाहत असत. मराठय़ांचा उदय केवळ जंगलात पेटलेल्या वणव्यासारखा झाला नाही, तर ती दीर्घकाळ चाललेली उत्क्रांती आहे. त्याची पाळेमुळे संतपरंपरेपर्यंत जातात, असे त्यांनी म्हटले आहे. व्यक्तिकेंद्रित इतिहासाची मांडणी त्यांनी तेव्हासुद्धा टाळली. त्यांच्या इतिहासाचे नायक केवळ शिवाजी महाराज नाहीत. तर तो सबंध मराठी समाज आहे. तर त्याचे नेतृत्व महाराजांकडे आहे. त्यांनी नेहमी शास्त्रीय व राष्ट्रीय दृष्टीकोन ठेवला. पण, ते संकुचितकडे वळले नाही. त्यांच्याकडे कोणताही अभिनिवेश नव्हता. हिरव्या, लाल वा भगव्या अशा कोणत्याही रंगाचा इतिहास असो. असे चष्मे लावणे स्वत:वरही अन्याय करण्यासारखे आहे. इतिहास वस्तुनिष्ठ द्यायचा असेल, तर असे चष्मे लावून चालणार नाही. याची जाणीव त्यांनी करून दिली. इतिहासात परखड चिकित्सा, समतोल मांडणीची दृष्टीही त्यांनीच दिली.
रानडे यांनी 1892 मध्ये सामाजिक परिषदेत अध्यक्षपदावरून मांडलेले विचारही अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याच्यावरच आपली सबंध रचना, समग्र मूल्यव्यवस्था आधारलेली आहे. बंधनाकडून स्वातंत्र्याकडे, भोळसट भक्तिभावाकडून निखळ दृष्टीकोनाकडे, बाब वाक्यं प्रमाणम् नाही. ग्रंथप्रामाण्याकडून विवेकाकडे, असंघटित जीवनाकडून संघटित जीवनाकडे, धर्मांधतेकडून सहिष्णतुतेकडे, आंधळय़ा प्रारब्धवादकाडून मानवतेच्या प्रतिष्ठेकडे, असा प्रवास ते मांडतात. रानडे यांना धर्मभोळेपणा वा कर्मकांड अभिप्रेत नाही. सार्वजनिक जीवनात नैतिकता असावी, याबाबतही ते आग्रही दिसतात. आजचे राजकारण आपण पाहतच आहोत. त्यावर अधिक न बोललेले बरे. सर्वच राजकीय पक्ष, त्यांची संस्कृती बिघडली आहे. मात्र, नैतिकतेचा धागा किती महत्वाचा आहे, हे रानडे यांच्या विचारातून कळते. त्यातून बोध घेतला पाहिजे, अशी अपेक्षाही डॉ. दीक्षित यांनी व्यक्त केली.