अनेक घरांचे-साहित्याचे नुकसान, ग्रामस्थ हैराण
प्रतिनिधी /बेळगाव
मागील काही दिवसांपासून बस्तवाड (हलगा) गावात माकडाच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. शिवाय अनेकांच्या घरगुती साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. माकडांना वैतागून अखेर ग्राम पंचायतीने माकड पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा जीव भांडय़ात पडला आहे.
बस्तवाड (ह.) येथे माकडाच्या कळपाने उच्छाद मांडून अनेकांच्या घरांची कौले, काचा, खिडक्मया आणि इतर साहित्याचे नुकसान केले आहे. दरम्यान अनेकांनी माकडांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर धावून जाण्याचेही प्रसंग घडत आहेत. शिवाय परिसरातील केळी, पेरू आणि आंब्यांचे नुकसान केले आहे. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे ग्राम पंचायतीनेच माकडे पकडण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मागील काही दिवसांपासून विनाकारण ग्रामस्थांना नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे तातडीने माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. दरम्यान, याबाबत तक्रार करूनही वनविभागाने दुर्लक्ष केले आहे. पकडलेल्या माकडांना पिंजऱयात घालण्यात येत आहे. ही मोहीम सुरू असली तरी इतर माकडांकडून धुमाकूळ सुरूच आहे. त्यामुळे माकडे पकडण्याची मोहीम निरंतर सुरू ठेवावी, अशी मागणी होत आहे.
वर्गणी काढल्याने नाराजी
गावात माकडे पकडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक कुटुंबाकडून 200 रुपये वर्गणी जमा केली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. वन्यप्राण्यांना पकडणे हे वनविभागाचे काम असले तरी माकडांना पकडण्यासाठी ग्रामस्थांकडून पैसे जमा केले जात आहेत. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.