राज्यसभा अध्यक्षांची घोषणा, निलंबित खासदारांची चक्री निदर्शने
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
निलंबित करण्यात आलेल्या विरोधी पक्षांच्या 20 खासदारांनी त्यांना गैरशिस्त वर्तनासाठी क्षमायाचना केल्यासच त्यांचे निलंबन रद्द केले जाऊ शकते, असा इशारा राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी दिला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बुधवारी त्यांची भेट घेऊन निलंबन रद्द करण्याची मागणी केली होती.
राज्यसभा अध्यक्षांनी मोठय़ा संख्येने खासदारांचे निलंबन केले आहे. ही बाब योग्य नाही. यामुळे सभागृहातील उपस्थितवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे निलंबन रद्द करावे, तसेच महागाईवरील चर्चा सभागृहात केव्हा होणार याची निश्चित वेळ आणि दिनांक घोषित करावा, अशी मागणी या नेत्यांनी केली. या बैठकीत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, सभागृहाचे नेते पियुष गोयल आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री मुरलीधरन यांचाही सहभाग होता.
केंद्रीय अर्थमंत्र्यांना कोरोना
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्या विलगीकरणात आहेत. त्या बऱया होताच महागाईवरील चर्चा संसदेत घडविण्यात येईल. पुढील आठवडय़ाच्या प्रारंभी कदाचित राज्यसभेत या विषयावर चर्चा घेतली जाईल. चर्चेला उत्तर देण्यासाठी कोणताही मंत्री असू शकतो. त्यासाठी अर्थमंत्रीच आवश्यक आहेत असे नाही, असेही काही विरोधी पक्षांचे मत आहे.
विरोधकांमध्येच मतांतर
तथापि, काही विरोधी पक्षनेत्यांच्या अनुसार महागाई संदर्भात जे मुद्दे उपस्थित झालेले आहेत, त्यांची तीव्रता पाहता केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीतच चर्चा होणे आवश्यक आहे. कारण विरोधी पक्षांच्या काही आक्षेपांना त्याच उत्तरे देऊ शकतात. अन्य मंत्री त्यासाठी उपयुक्त ठरणार नाही, असे या नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, या मुळे या मुद्दय़ावरही विरोधकांमध्ये एकमत नसल्याचे दिसून येत आहे.
अध्यक्षांची सूचना
सभागृहात प्रत्येक सदस्याने, मग तो सत्ताधारी पक्षाचा असो, की विरोधी पक्षाचा, त्याने शिस्त आणि नियमांचे पालन करणे आवश्यकच आहे. त्याला पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या सदस्यांना नियम आणि शिस्त यासंबंधी माहिती द्यावी आणि तशी वर्तणूक करण्याचा आदेश द्यावा. मग कोणालाही निलंबित करण्याची आवश्यकताच उरणार नाही. शिस्त मोडल्याने काहीही साध्य होणार नाही, असा सल्ला व्यंकय्या नायडू यांनी दिला आहे.
चक्री निदर्शने
विरोधी पक्षांच्या 20 निलंबित खासदारांनी संसद परिसरात निलंबनाच्या विरोधात चक्री निदर्शने सुरु केली आहेत. ही निदर्शने 50 तास चालणार आहेत. आम्ही येथेच खाऊ, येथेच झोपू, पण निदर्शने थांबविणार नाही. निलंबन मागे घेईपर्यंत आमचा विरोध कायम राहील, असे प्रतिपादन या खासदारांनी केले. या निदर्शनांमध्ये 20 पैकी 18 निलंबित खासदार भाग घेत आहेत.