ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून काही ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे, या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. CBSE बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर 12 वीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.
बोर्डाच्या परीक्षांबाबत शिक्षण मंत्रालय आणि CBSE च्या अधिकाऱ्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली. त्यानंतर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, ऑब्जेक्टिव्ह निकषांच्या आधारे 10 वीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीनुसार गुण दिले जाणार आहेत. एखादा विद्यार्थी समाधानी नसल्यास त्यांना आणखी एक संधी देण्यात येणार आहे .
12 वी च्या परीक्षा 4 ते 14 जून या कालावधीत होणार होत्या. मात्र, देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेेत, परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. 1 जून रोजी कोरोना परिस्थितीचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात येईल, आणि त्यानंतर काय करायचे हे निश्चित केले जाणार आहे. परीक्षा झाल्यास विद्यार्थ्यांना 15 दिवस अगोदर माहिती दिली जाईल.