26 रोजी धरणे आंदोलन : दोन हजाराहून अधिक सीमावासियांची उपस्थिती
प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाक्याला कर्नाटक सरकारने दडपशाही करत परवानगी नाकारली. यामुळे आपला निषेध व्यक्त करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. 26 डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी आयोजित मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत देण्यात आली.
मध्यवर्ती म. ए. समितीची तातडीची बैठक बुधवारी मराठा मंदिर येथे पार पडली. या बैठकीत महामेळाव्याला परवानगी नाकारल्याबद्दल तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. कर्नाटक सरकार सीमावासियांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न वेळोवेळी करत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या नेते व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले. असाच प्रकार महामेळाव्याच्या वेळीही घडला. ही घटनेची पायमल्ली असून महाराष्ट्र सरकारने याचा विचार करावा, असे मत कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी व्यक्त केले.
मध्यवर्ती म. ए. समितीने वेळोवेळी परवानगीसाठी पोलीस तसेच मनपा प्रशासनाकडे पत्र दिले होते. महाराष्ट्रातील नेत्यांना न बोलाविता महामेळावा करा, असे पोलिसांनी मेळाव्याच्या आदल्या दिवशीपर्यंत सांगितले होते. परंतु, सोमवारी मात्र घातलेला मंडप काढत महामेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली. पोलिसांची ही दुटप्पी भूमिका असून निद्रावस्थेतील महाराष्ट्राला जागविण्यासाठी ‘चलो कोल्हापूर’चा नारा देण्यात आला आहे. सोमवार दि. 26 रोजी सकाळी 8.30 वाजता बेळगाव येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथील शिवमूर्तीला वंदन करून म. ए. समितीचे हजारो कार्यकर्ते कोल्हापूरला रवाना होणार आहेत. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे भव्य धरणे आंदोलन होणार आहे.
सहानुभूती नको, कृतीतून उत्तर द्या
महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांकडून केवळ ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत’ असे आश्वासन दिले जाते. परंतु, प्रत्यक्षात मात्र कोणतीच कृती होत नाही. महाराष्ट्राच्या या भूमिकेमुळेच कर्नाटक सरकारचा अत्याचार वाढला आहे. त्यामुळे यापुढे महाराष्ट्राने सहानुभूती न दर्शविता कृतीतून उत्तर द्यावे. सीमावासियांसाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येत एक दिवस महाराष्ट्र बंद करून सीमावासियांचा आवाज बुलंद करावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
यावेळी खजिनदार प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, संभाजी देसाई, धनंजय पाटील, यशवंत बिर्जे, प्रकाश चव्हाण, रमेश धबाले, गोपाळ देसाई, राजीव पाटील, बी. ओ. येतोजी, बी. एस. पाटील, बी. डी. मोहनगेकर, अॅड. एम. जी. पाटील यांसह मध्यवर्ती म. ए. समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.