सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय पालटविला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2012 मधील दिल्लीतील छावला सामूहिक बलात्कार प्रकरणाशी निगडित खटल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने रवि, राहुल आणि विनोद या तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे. उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालयाने या तिघांना मृत्युदंड ठोठावला होता. 2012 मध्ये दिल्लीत उत्तराखंडच्या 19 वर्षीय युवतीवर आरोपींनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडून बलात्कार करत तिची हत्या केली होती.
निर्भयाप्रमाणेच या पीडित युवतीचे नाव बदलून अनामिका ठेवण्यात आले होते. संबंधित युवती उत्तराखंडच्या पौडी गढवाल येथील रहिवासी होती. दिल्लीत छावला येथील कुतुब विहारमध्ये ती राहत होती. 9 फेब्रुवारी 2012 रोजी अनामिका काम संपविल्यावर घरी परतत असताना तीन आरोपींनी तिचे अपहरण केले होते. यानंतर आरोपींनी तिच्यावर क्रूर बलात्कार केला होता. तर अनामिका घरी न परतल्याने कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. मोठा तपास केल्यावर पोलिसांना मृतदेह हरियाणाच्या रेवाडीमध्ये अत्यंत वाईट अवस्थेत आढळून आला होता. अनामिकाचा अनन्वित छळ करत जीव घेण्यात आला होता.
सामूहिक बलात्कार करण्यासह आरोपींनी तिच्या शरीराला सिगारेट तसेच तप्त लोखंडी सळीने डागण्या दिल्या होत्या. मुलीच्या चेहऱयावर आणि डोळय़ांवर ऍसिड ओतण्यात आले होते. अनामिका सामूहिक बलात्कार प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. सरन्यायाधीश लळीत आणि न्यायाधीश रविंद्र भट्ट तसेच बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाने याप्रकरणी 6 एप्रिल रोजी निर्णय राखून ठेवला होता.
दिल्ली सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी मृत्युदंड ठोठावण्याची मागणी केली होती. तर दोषींच्या वर्तनात सुधारणा होण्याच्या शक्यतेवर विचार करण्याची विनंती त्यांच्या वकिलाकडून करण्यात आली होती. दोषींपैकी एक असलेला विनोद हा बौद्धिक अक्षमतेने पीडित आहे, त्याच्याकडे विचार करण्याची सामान्य क्षमता नसल्याचाही युक्तिवाद करण्यात आला होता. उच्च न्यायालयाकडून दोषी ठरविण्यात आलेले तिघेही कारचालक होते. दिल्ली पोलिसांनी गुन्हय़ाला ‘रेयरेस्ट ऑफ रेयर’ ठरवत तिघांनाही मृत्युदंड ठोठावण्याची मागणी केली होती.