ह्य्दय मात्र गोव्यासाठी ठेवणार असल्याचे मिश्किल भाष्य
प्रतिनिधी / पणजी
मूत्रपिंड, यकृत आणि कोर्निया (बुब्बळ) हे अवयव आपण गरजवंतांसाठी दान करणार असून हृदय मात्र गोव्यासाठी ठेवणार आहे, असे मिश्किल भाष्य करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मरणोत्तर अवयवदान करण्याची शपथ घेतली. त्यासंबंधी स्वत:ची ऑनलाईन नोंदणी करून त्यांनी प्रमाणपत्रही प्राप्त केले आहे.
भाजपतर्फे देशभरात आयोजित करण्यात आलेल्या सेवा पंधरवड्याचा भाग म्हणून गोव्यातही भाजपच्या वैद्यकीय विभागाकडून अवयवदानाबद्दल जागृती करण्यात येत आहे. त्यानिमित्त गुऊवारी भाजप प्रदेश मुख्यालयात अवयवदान नोंदणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास व्यासपीठावर त्यांच्यासह पक्षाच्या वैद्यकीय विभागाचे अध्यक्ष डॉ. शेखर साळकर, सहप्रमुख डॉ. स्नेहा भागवत आणि प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक यांची उपस्थिती होती.
प्रत्येकाने अवयवदान करावे
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, राज्यातील प्रत्येक नागरिकाने अवयवदान केल्यास अनेक गरजवंत ऊग्णांना नवजीवन मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला व या सत्कार्यात प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन केले. गोमेकॉत लवकरच हृदय आणि यकृत रोपण शस्त्रक्रियेची सोय करण्यात येणार असून नेत्रपेढीही पूर्ववत सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मूत्रपिंड प्रत्यारोपण दीनदयाळ योजनेत
राज्यात आणि देशात सध्या सर्वाधिक गरज असलेला मानवी अवयव म्हणजे मूत्रपिंड आहे. हजारो ऊग्ण या अवयवाच्या प्रतीक्षेत आहेत. गोव्यात या घडीस 46 ऊग्णांना मूत्रपिंडाची आवश्यकता आहे. त्यात रोज नवनवीन ऊग्णांची भर पडत आहे. मात्र तेवढ्या संख्येने मूत्रपिंड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अवयवदानासाठी नागरिक पुढे आल्यास अशा गरजवंतांना त्याचा लाभ होऊन नवजीवन मिळणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यादृष्टीने सरकार लवकरच मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेच्या कक्षेत आणणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
गोव्यात अवयवदान यशस्वी
आतापर्यंत गोव्यात अवयवदानाची चार प्रकरणे यशस्वी झाली आहेत. असे अवयव दान करण्यासाठी व्यक्ती 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची असायला हवी. एका ब्रेन डेड व्यक्तीच्या अवयवदानामुळे पाच जणांना जीवदान मिळू शकते. त्यासाठी सदर व्यक्तीने संकेतस्थळावर नोंदणी केली असली तरीही ब्रेन डेड जाहीर केल्यानंतर त्याच्या कुटुंबातील जवळच्या सदस्यांनी संबंधिताच्या अवयव दानासाठी मान्यता द्यावी लागते, त्यानंतरच हे सोपस्कार पूर्ण करण्यात येतात, असे डॉ. शेखर साळकर यांनी यावेळी सांगितले.
डेंग्यू ‘एसओपी’चे पालन करावे
पत्रकारांनी डेंग्यूसंबंधी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सध्या डेंग्यू नियंत्रणात असल्याचे सांगितले. तरीही लोकांनी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा केंद्रे तसेच इस्पितळांना देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.