तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणाचे निष्कर्ष जाहीर
वृत्तसंस्था/ पॅरिस
चिकनगुनिया विषाणूमुळे भारतासमवेत अनेक देशांमध्ये मोठ्या संख्येत रुग्णसंख्या दिसून येते. या आजारावरील लसीसंबंधी आता शुभवार्ता आहे. चिकनगुनियाच्या विरोधातील पहिल्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणाचे निष्कर्ष अत्यंत प्रभावी राहिले आहेत. परीक्षणात ही लस सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. फ्रेंच बायोटेक कंपनी वेलनेवाकडून याची निर्मिती करण्यात येत आहे. ही लस एका डोसमध्ये उपलब्ध होणार आहे.
कंपनीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणाचा डाटा लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित करण्यात आला आहे. सद्यकाळात चिकनगुनिया संक्रमणामुळे होणारा आजार रोखण्यासाठी कुठलीच मान्यताप्राप्त लस नाही. तसेच याकरता प्रभावी अँटीव्हायरल उपचार देखील नाही.
या लसीसंबंधीचे अध्ययन अमेरिकेत करण्यात आले आहे. लसीच्या यशस्वी परीक्षणाचा भारतासारख्या देशांवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडणार असल्याचे लॅन्सेटच्या अहवालात म्हटले गेले आहे. चिकनगुनियाचे रुग्ण भारतात दरवर्षी आढळून येतात.
परीक्षणाच्या निष्कर्षानुसार एका डोसनंतर लसीने चिकनगुनियापासून बचावासाठी 99 टक्के सहभागी लोकांमध्ये (263/266) न्यूट्रीलाइंजिंग अँटीबॉडीज निर्माण केल्या. परीक्षणात लसीकरणानंतर अँटीबॉडीजच्या पातळीत वाढ दिसून आल्याची माहिती अध्ययनाच्या प्रमुख लेखिका मार्टिना श्नाइडर यांनी दिली आहे.
चिकनगुनिया हा एक डासांपासून फैलावणारा आजार आहे. संक्रमित डासने चावा घेतल्याने हा आजार होत असतो. डासाने चावा घेतल्याच्या 7-8 दिवसांनी संबंधिताला ताप येतो, या आजाराच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, थकवा आणि स्नायू तसेच सांध्यांमध्ये वेदना सामील आहे. यात सांधेदुखी रुग्णाला कमजोर करणारी ठरत असते. साधारणपणे हा आजार काही दिवसांपर्यंत राहतो. परंतु अनेक प्रकरणांमध्ये हा आजार आठवडे, महिने किंवा वर्षांपर्यंतही कायम राहू शकतो. आजाराने गंभीर स्थिती धारण केल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका असतो असे तज्ञांचे सांगणे आहे.