चक्रीवादळापूर्वीच मुंबई-भूज-राजकोटमध्ये 7 बळी : गुजरातच्या 7 जिल्ह्यांमधील 21 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविले
वृत्तसंस्था/ पोरबंदर
अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. हे चक्रीवादळ 15 जून रोजी दुपारी कच्छ जिल्ह्यातील जखौ बंदराला धडकण्याची शक्यता आहे. तर हवामान विभागानुसार मंगळवारी चक्रीवादळ काही प्रमाणात कमजोर झाले असले तरीही अद्याप ते धोकादायकच आहे. 15 जून रोजी हे चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकल्यावर 150 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहण्याचा अनुमान आहे. चक्रीवादळामुळे गुजरात अन् मुंबईनजीकच्या किनारी भागांमध्ये वादळी पाऊस पडत असून यामुळे 7 जणांना जीव गमवावा लागला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी दिल्लीत राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मंत्र्यांसोबत बैठक घेतली आहे. शाह यांनी बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी 8 हजार कोटी रुपयांच्या 3 मोठ्या योजनांची घोषणा केली. यात अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण, पूर नियंत्रण आणि भूस्खलनाच्या घटना रोखणे सामील आहे. तर चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने कच्छ-सौराष्ट्रमध्ये समुद्र किनाऱ्यापासून 10 किलोमीटरच्या अंतरापर्यत वास्तव्य करणाऱ्या 21 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.
चक्रीवादळ मंगळवारी सकाळी 8 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने पुढे सरकत होत. चक्रीवादळ मंगळवारी पहाटे 5.30 वाजता पोरबंदरपासून 300 किलोमीटर अंतरावर होते. चक्रीवादळ किनाऱ्यानजीक पोहोचल्याने वाऱ्याचा वेग 150 किलोमीटर प्रतितासापर्यंत पोहोचण्याची शक्यता असून यामुळे वृक्ष, दुरध्वनी आणि विजेचे खांब उन्मळून पडू शकतात असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी म्हटले आहे.
14-15 जूनदरम्यान कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जूनागढ आणि मोरबी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अतिवृष्टीचा इशार देण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे 15 जून रोजी कच्छ, द्वारका अन् जामनगरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सखल भागात पूर येण्याचा धोका आहे. मच्छिमारांना 16 जूनपर्यंत समुद्रात न जाण्याची सूचना करण्यात आली आहे. गुजरातमध्ये 14 जूनसाठी ऑरेंज अलर्ट आणि 15 जूनसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
67 रेल्वेफेऱ्या रद्द
बिपरजॉय चक्रीवादळामुळे पश्चिम रेल्वेने खबरदारीदाखल 67 रेल्वेफेऱ्या रद्द केल्या आहेत. याचबरोबर सौराष्ट्राच्या ओखा, पोरबंदर आणि जामनगर येथून सुरू होणाऱ्या 25 रेल्वेफेऱ्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. गुजरातमध्ये एनडीआरएफची 12 पथके तैनात करण्यात आली आहेत. तर 15 पथकांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. तटरक्षक दल, सैन्य आणि नौदलाच्या बचाव तसेच मदतपथकांनाही तयारीत राहण्यास सांगण्यात आले आहे. कच्छ जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले असून तीन दिवसांसाठी सर्व शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे.