शाळेच्या पहिल्याच दिवशी पावसाची दडी, नवीन विद्यार्थ्यांचे ओवाळणी करून स्वागत
सांखळी : सांखळी शहर तसेच ग्रामीण भागातील पाळी, श्री नवदुर्गा, वेळगे श्रीमती हायस्कूल, सिद्धार्थ बांदोडकर उच्च माध्यमिक विद्यालय, भामई ताराबाई दळवी विद्यालय, फादर शैक्षणिक संस्थेचे हायस्कूल, सुर्ल सरकारी माध्यमिक विद्यालय, कोठंबी टागोर विद्यालय, कुडणे महालक्ष्मी हायस्कूल, न्हावेली सरकारी माध्यमिक विद्यालय, विविध उच्च माध्यमिक विद्यालय, आमोणा सरकारी विद्यालय, हरवळे श्री गणेश विद्यालय, आणि सांखळी शहरातील सरकारी विद्यालय आणि खाजगी विद्यालय आदी सर्व सरकारी प्राथमिक शाळात सोमवारी शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट आता सुरू झाला आहे.
बहुतेक विद्यालयात पाचवी वर्गात येणाऱ्या विद्यार्थी वर्गाचे भारतीय संस्कृतीनुसार ओवाळणी करून स्वागत करण्यात आले. हरवळे येथील श्री गणेश विद्यालयात पाचवीत येणाऱ्या विद्यार्थीवर्गाचे शिक्षकांनी स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक दामोदर मालवणकर यांच्या मार्गदर्शनखाली आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यालयात खास वातावरण निर्मिती करण्यात आली होती. आजच्या आधुनिक काळात शिक्षणाचा स्तर खूपच उंचावला असून विविध क्षेत्रात स्पर्धा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. शिक्षणातून देशाचे आणि संस्कृतीचे रक्षण झाले पाहिजे. इतिहासापासून बोध घ्यावा व भविष्याच्या वाटेवर पुढे जायचे असते, असे मत जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर यांनी व्यक्त केले. वेळगे येथील श्रीमती विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापिका चित्रा परांजपे, सरपंच सामंता कामत शिक्षकवर्ग उपस्थित होता. तीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागातून शाळेला जाणे म्हणजे एक वेगळीच मजा होती. हातात एक नोंद वही, शर्ट च्या खिशात एक पेन, पॅन्टच्या खिशात चिल्लर पैसे, वाटेत लागणार धोधो पाऊस, ओलाचिंब भिजलेला तो शाळेचा गणवेश, वाटेत पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावर कागदी होड्या सोडणे अशी खूपच मज्जा असायची. मात्र आजच्या काळात सगळं बदललेल आम्हाला पाहायला मिळत आहे. आज घरच्या दारातून शाळेच्या दारात पोहोचणे खूप सोपं झालं आहे, असे सुर्लकर यांनी सांगितले.
विविध ठिकाणी रस्त्यावर ट्रॅफिक पोलीस
सोमवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने होंडा -फोंडा यामुख्य रस्त्यावर पोलीस पाहायला मिळाले. सांखळी शहर, हरवळे भामई, पाळी, वेळगे, होंडा येथे ट्रॅफिक पोलिसांचे खास लक्ष होते. घरी लवकर जाण्याच्या नादात काही वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवताना निदर्शनास आले. तसेच वाहतूक विषयावर आम्ही कडक पावले उचलली असून नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही तसेच आपल्या अल्पवयीन मुलावर पालकांनी लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.