राजकारण-गावातील सार्वजनिक जमिनीच्या मालकीवरून वादावादी : परस्परविरोधात पोलिसांत तक्रार
खानापूर : खानापूर तालुक्यातील चिगुळे येथे दोन गटात झालेल्या मारामारीत 25 जण जखमी झाले आहेत. काहींना अधिक उपचारासाठी बेळगाव येथील बिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर एकावर केएलईत उपचार सुरू आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. खानापूर पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करून पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. राजकारण आणि गावातील सार्वजनिक जमिनीच्या मालकीवरून झालेल्या वादाचे मारामारीत रुपांतर झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, अनंत गावडे आणि वासुदेव चौगुले हे आपल्या शेतात मंगळवारी 6 रोजी काम करत होते. यावेळी शिवाजी चौगुले हे गुरे घेऊन शेताकडे गेले. त्यावेळी अनंत गावडे व वासुदेव चौगुले यांनी शिवाजी चौगुले यांना गुरे शेतात येऊन भातपिकाचे नुकसान केल्यावरून जाब विचारला होता. यावरून बाचाबाची व वाद झाला होता. याचे पडसाद गावात उमटले. मंगळवारी दुपारी शिवाजी चौगुले यांच्या घरावर पंचवीस-तीस जणांनी मिळून हल्ला चढविला होता. यात रामनाथ चौगुले, शिवाजी चौगुले यांसह त्यांचे कुटुंबीय जखमी झाले होते. बुधवारी सकाळी याबाबत शिवाजी चौगुले व रामनाथ चौगुले यांनी आपल्या गटाची बैठक घेऊन खानापूर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी तयारी सुरू केली होती. त्याचवेळी महादेव गावडे यांच्या गटाने रामनाथ चौगुले यांच्या गटावर बुधवारी सकाळी तिखटपूड फेकून लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. त्यात शिवाजी चौगुले, अनंत चौगुले, रामनाथ नारायण चौगुले, रामा महादेव चौगुले, नारायण महादेव चौगुले, महादेव रामा गावडे, कामण बारकू चौगुले, गोमा महादेव चौगुले, रामा विठ्ठल चौगुले, विनोद विष्णू चौगुले, रिया रामनाथ चौगुले व महादेव अशोक गावडा हे गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तर यात रिया रामनाथ चौगुले हिच्या डोक्याला जबर मार बसल्याने अधिक उपचारासाठी केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
तर दुसऱ्या गटातील प्रभावती गावडे, महेश गावडे, प्रताप गावडे, आनंद गोविंद गावडे, सहदेव सुपडा गावडे, सुरेश सातू नाईक, रेष्मा गावडे, दुलाजी गावडे, अमित चौगुले यांच्यावरही सिव्हिलमध्ये उपचार करून सोडण्यात आले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर फिर्याद दाखल केली आहे. मारामारीचे मूळ कारण ग्राम पंचायतीचे राजकारण असून रामनाथ चौगुले आणि महादेव गावडे या दोघांनी निवडणूक लढवली होती. त्याच्यात रामनाथ चौगुले विजयी झाले होते. यानंतर गेली काही वर्षे गावात सातत्याने वाद व गटातटाचे राजकारण सुरू आहे. त्यात अनेकवेळेला छोट्या-मोठ्या वादावादीचे प्रसंग घडले होते. तसेच गावमालकीची पंचवीस एकर जमीन असून ही जमीन गावातील काही मोजक्या कुटुंबांच्या नावाने आहे. या जमिनीवरूनही वाद झाले होते. यापूर्वी पोलिसांनी बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले होते. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर फिर्याद दिली असून पोलिसांनी फिर्यादी दाखल करून घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.