मागीलवर्षीपेक्षा 5.65 फूट पाणीसाठा कमी
वार्ताहर /तुडये
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची पाणीपातळी खालावली असून बुधवारी सकाळी 2450 फूट इतकी नोंद झाली आहे. मागीलवर्षी याचदिवशी 2455.65 फूट इतकी पाणीपातळी होती. मागीलवर्षीच्या मानाने सध्या जलाशयात 5.65 फूट पाणीसाठा कमी आहे. जलाशयात आता शहराला पुरवठा करण्यासाठी दोन फूट पाणीसाठा शिल्लक आहे. त्यानंतर मात्र मृत साठ्यातील (डेडस्टॉकमधील) पाणी उपसा करण्याची वेळ शहर पाणीपुरवठा मंडळावर येणार आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी एक 50 हॉर्स पावरचे विद्युत मोटर जलाशयात सोडण्यात आली आहे. पाण्याचा प्रवाह कमी होताच पाणी मोटरीच्या साहाय्याने उपसा करण्याची तयारी सुरू केली आहे. आणखी दोन मोटारी पाणी उपसा करण्यासाठी वापराव्या लागणार आहेत. यासाठी लागणाऱ्या पीव्हीसी पाईप 2019 साली बसविण्यात आल्या आहेत. केवळ मोटारी बसविणे बाकी राहिले आहे.
गाळ काढण्याकडे दुर्लक्ष
1960 साली जलाशय उभारणीचे काम सुरू झाले आणि 1962 मध्ये जलाशयात प्रत्यक्षात पाणी साठविण्यात आले. 1962 साली शहराला लागणाऱ्या पाण्याच्या मागणीनुसार 2470 पाणीपातळी करण्यात आली होती. शहराला पाणीपुरवठाही मुबलक होत होता. 1985 साली शहराची पाणीटंचाई समस्या दूर करण्यासाठी मार्कंडेय नदीला सहा वेस्ट वेअरचे दरवाजे उभारून पाणीपातळी 2475 फुटांपर्यंत पाच फुटांनी वाढवली. त्यानंतर 2017-2018 व 2019 या तीन वर्षांत वेस्ट वेअरच्या सहाही दरवाज्यांवर वेल्डांगने पत्रे बसवून पाणीपातळी 2478 ते 2480 फुटांपर्यंत वाढविली. त्यानंतर मात्र मागील दोन वर्षांपासून तुडये-मळवी परिसरातील शेतकऱ्यांनी जलाशयाच्या वाढीव पाणीपातळीच्या अतिक्रमणाविरोधात आक्रमक पवित्रा घेत पाणीपातळी 2475 फुटांवरच कायम ठेवल्याने पाणीटंचाईची समस्या यावेळीही निर्माण झाली आहे. या जलाशयाचा मुख्य बंधारा हा मातीचा आहे. त्यावर दगडांचा वापर करून संरक्षण दिले आहे. पाणीपातळी वाढविताना बंधारा पाणी साठवण्यासाठी योग्य दर्जाचा आहे काय? याची पाहणी करणे गरजेचे आहे. 61 वर्षांच्या कालावधीत मार्कंडेय नदीपात्र पूर्णपणे गाळाने भरले आहे. तसेच जलाशयातही दोन ते तीन फूट गाळ साचला आहे. गाळ काढण्यासाठी कोणतीच कार्यवाही कर्नाटक शासनाने केली नाही.