रत्नागिरी प्रतिनिधी
कोकण बोर्डाची यावर्षीची दहावीची परीक्षा आज संपली. दुपारी परीक्षा संपताच घरी निघालेल्या मुलांनी एकमेकांना रंग फासत ऐन शिमगोत्सवात खेळायची राहून गेलेली रंगपंचमी साजरी केली. परीक्षा असल्याने मुलांची रंगपंचमी खेळण्याची राहून गेली होती. परीक्षा असल्याने मुलं अभ्यासातच गर्क होती. त्यामुळे आज परीक्षा संपताच परीक्षा केंद्रावरून बाहेर पडणाऱ्या मुलांनी रंगपंचमीचा आनंद लुटला परीक्षा संपल्याने मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत होता.
शाळा परिसर, बसस्थानक, तसेच बसथांबे या ठिकाणी चेहरे रंगलेली शाळकरी मुले दिसून येत होती. मुलं रंग खेळत असताना मात्र इतर नागरिक रंग लागू नये म्हणून त्यांच्यापासून दूर पळत होते. काही नागरिकांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांनी साजऱ्या केलेल्या रंगपंचमीची तक्रार केली. तर काही नागरिकांनी मुलांना ओरडणाऱ्या नागरिकांना शांत राहण्याचा सल्ला दिला. दहावीची परीक्षा संपल्यामुळे टेन्शन मुक्त मुलांना रंग खेळू दे अशा सूचनाही त्यांनी ओरडणाऱ्या नागरिकांना केल्या.