ऑनलाईन टीम / मुंबई :
इर्शाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 86 जण ढिगाऱ्याखाली अडकले असून, घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या दुर्घटनेत अनेक मुलांनी त्यांचा आधार गमावला आहे. या मुलांच्या पालकत्वासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनमार्फत इर्शाळवाडीतील मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी या संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. त्यामध्ये ते म्हणतात, ज्या इर्शाळगडाच्या कडेकपारीच्या अंगाखांद्यावर येथील मंडळी खेळली, तोच निसर्ग काळ होऊन आला. काही कळायच्या आत दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. रात्री झोपेत असलेल्या अनेकांचे जीव गेले. काही अद्याप बेपत्ता आहेत.
शिक्षणासाठी आश्रमशाळा किंवा अन्यत्र असलेल्या मुलांनी आपले आई-वडील गमावले. दोन वर्षांपासून 14-15 वर्षांपर्यंतची मुले अनाथ झाली. या मुलांच्या वाटय़ाला आलेल्या वेदना, दुःख सांत्वनापल्याड आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आहे. त्यांच्या आयुष्यात या कठीण आणि परीक्षेच्या काळात पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे. समाज म्हणून या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना मायेच्या पंखाखाली घेणे, विश्वासाची ऊब देणे ही आपली जबाबदारी आहे.
ज्या इर्शाळगडाच्या कडेकपारीच्या अंगाखांद्यावर येथील मंडळी खेळली, तोच निसर्ग काळ होऊन आला. काही कळायच्या आत दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. रात्री झोपेत असलेल्या अनेकांचे जीव गेले. काही अद्याप बेपत्ता आहेत.
शिक्षणासाठी आश्रमशाळा किंवा अन्यत्र असलेल्या मुलांनी आपले आई-वडील…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 22, 2023
हीच बाब लक्षात घेऊन इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने ठरवले आहे. काळाने येथील मुलांवर मोठा आघात केला असला तरी त्यांचे आयुष्य सावरून जगण्याचे बळ देण्याचा निश्चय करण्यात आला आहे. या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेण्यात येत आहे.