न्यायालयात दोन दिवसात 150 हून खटले निकालात : 25 रोजीपर्यंत आयोजन
वार्ताहर /खानापूर
राष्ट्रीय लोकअदालत अंतर्गत खानापूर प्रथम वर्ग न्यायालयात गेल्या 20 जूनपासून तक्रारी निवारणासाठी लोकअदालत सुरू करण्यात आली आहे. या लोकअदालतीत आपले खटले निकालात काढण्यासाठी अनेकांनी सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.
गेल्या दोन दिवसात 150 हून अधिक खटले निकालात काढण्यात आले आहेत. सदर अदालत शनिवार दि. 25 जूनपर्यंत चालणार आहे. ज्यांचे खटले प्रलंबित आहेत त्यांनी या लोकअदालतीला उपस्थित राहून तक्रारींचे निवारण करून घ्यावे, असे आवाहन तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी केले आहे. सोमवारपासून येथील प्रथम वर्ग न्यायालयात लोकअदालतमध्ये तक्रार निवारणासाठी पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सेवा बजावत आहेत.
शिवाय न्यायाधीश सूर्यनारायण तसेच न्यायाधीश श्रीमती झरीना खटले निकालात काढण्यासाठी समझोता घडवून आणत आहेत. प्रामुख्याने सहकारी संस्थांच्या कर्जाच्या देवाण-घेवाणसंदर्भात अनेक खटले न्यायालयात सुरू आहेत. अशा खटल्यांसंदर्भात प्रामुख्याने वनटाईम सेटलमेंट अशा पद्धतीने कर्जाची परतफेड करण्यासाठी व कर्जदाराला मुदत देऊन सहकारी संस्था वाचविण्याचेही कार्य न्यायाधीशांनी हाती घेतले आहे. प्रामुख्याने वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी, ऍड. जी. जी. पाटील, ऍड. केशव कळ्ळेकर, मारुती कदम, ऍड. आय. बी. लंगोटी, ऍड. एन. आर. पाटील, ऍड. मुल्ला, ऍड. कदम, ऍड. लोटूकर आदी वकीलवर्ग यासाठी प्रयत्नशील आहेत.