कडोली : येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान तळीरामांचा अड्डा बनत असून याकडे लक्ष घालून ग्रा.पं.ने या प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी होत आहे.
गावच्या पश्चिमेला आमराईत श्री छत्रपती शिवाजी महाराज हे भव्य मैदान असून ते गावची शान आहे. या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरील अनेक खेळाडू निर्माण झाले आहेत. हे मैदान खेळांचे आणि व्यायामाचे केंद्रबिंदू आहे. केवळ फिरायला आले तरी येथे आरोग्यदायी वाटते. इतकी स्वच्छता आतापर्यंत राखण्यात आली आहे. पण अलीकडे हे मैदान दारू ढोसण्यासाठी तळीरामांचा अड्डा बनू पाहत आहे.
गैरप्रकारांना आळा घाला
रात्रीच्या वेळी बिनधास्तपणे या मैदानाचा वापर दारू पिण्यासाठी करीत आहेत. मैदानावर दारूच्या बाटल्या, ग्लास, चकण्याची पाकिटे आदी केरकचरा पाहायला मिळत आहे. तेव्हा हा प्रकार थांबवून मैदानाची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. यासाठी ग्रा.पं.ने सूचनाफलक लावून गैरप्रकारांना आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.