मार्च महिन्यातच नदी-नाले-तलावांनी तळ गाठल्याने प्राण्यांना पाणी मिळणे झाले कठीण : भर उन्हामुळे जनावरेही हैराण
वार्ताहर /नंदगड
गेल्या काही दिवसांपासून उष्मा वाढला आहे. प्रखर उन्हामुळे सर्वजण अस्वस्थ होत आहेत. नदी, नाले, तलाव पाण्याअभावी कोरडी पडली आहेत. नदी-नाल्यांच्या ज्या डोहातून थोडेफार पाणी आहे. त्यातच पालापाचोळा साचला आहे. पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे जनावरांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. खानापूर तालुक्यात मलप्रभा, पांढरी, म्हादई या मुख्य नद्या वाहतात. त्यातच हलात्री, भांडुरा हे नालेही वाहतात. शिवाय नंदगड, बिडी गावादरम्यान वाहणारा तट्टीनाला, कापोली, गोधोळी, सन्नहोसूर, कारलगा, गर्लगुंजी, बिदरभावी, देवराई, हलसाल, इटगी, तिवोली दरम्यान अनेक नाले आहेत. शिवाय तालुक्यात 250 हून अधिक लहान मोठे तलाव आहेत. खानापूर तालुक्यातून वाहनाऱ्या नदी-नाल्यांचे व तलावाचे पाणी पावसाळ्यात जनावरांना पिण्यासाठी व कपडे धुण्यासाठी वापरण्यात येते. जानेवारी, फेब्रुवारी दरम्यान नदी-नाल्यांचे पाणी पूर्णत: आटते. तर क्वचित तलाव वगळता सर्वच तलाव उन्हाळ्यात कोरडी पडतात. यावर्षी दिवसेंदिवस प्रखर उन्ह पडत असल्याने मार्च महिन्यातच नदी-नाले व तलावांनी तळ गाठला आहे. एप्रिल महिन्यात उष्मा व उन्हाची तीव्रता पुन्हा वाढल्याने शिल्लक पाणीही आटल्याने जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. खानापूर तालुक्याचा पश्चिम व दक्षिण भाग जंगलानी व्यापला आहे. या भागात कूपनलिका नसल्याने येथील शेतकरी व जनावर मालकानी नदी-नाल्यांवरच अवलंबून रहावे लागते. तालुक्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी आर्थिक सहकार्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी जनावरे पाळली आहेत. यातून मिळणारे दूध विकून मिळणाऱ्या रकमेतून उदरनिर्वाह केला जातो.
अन्न-पाण्यासाठी जंगली जनावरे मानव वस्तीत येणाच्या घटना
तालुक्याच्या पश्चिम व दक्षिण भागात जंगल असल्याने जंगली प्राण्याना पाण्याची आवश्यकता आहे. उन्हाळ्यात जंगली जनावरांना पाण्याची समस्या भेडसावू नये, म्हणून वनखात्याच्यावतीने जंगलात ठिकठिकाणी तलाव खोदण्यात आली आहेत. यावर्षी एप्रिल महिन्यातच त्या तलावातील पाणी आटल्याने जंगली जनावरांना आपली तहान भागविणे कठीण झाले आहे. त्यामुळे जंगली जनावरे मानव वस्तीत येणाच्या घटना घडत आहेत. पावसाळ्यात अद्याप महिनाभर लांबणीवर आहे. तोपर्यंत जनावरांना पाणी कोठून आणून पाजवावे, हीच समस्या जनावर मालकांना लागून राहिली आहे. माणसांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याची सोय करण्यात येते. परंतु जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न कसे सोडवले जाणार याची चिंता जनतेला लागून राहिली आहे.
पूर्व भागातही भेडसावत आहे पाणी समस्या
खानापूर तालुक्याच्या पूर्व भागात शेतवडीतील पिकांना पाणी देण्यासाठी बोअरवेल खोदल्या आहेत. परंतु प्रखर उन्हामुळे बोअरवेलचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे जेथून पाणी मिळेल तेथून सायकल व दुचाकीवरुन पाणी आणून जनावरांना पाजण्यात येत आहे.