मध्यंतरी किडीचा प्रादुर्भाव, उत्पादनात घट होण्याची शक्यता
► प्रतिनिधी/ बेळगाव
मागील काही दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढल्याने कडधान्य पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उरल्या-सुरल्या कडधान्य पिकांवर शेतकऱ्याची आशा आहे. आधीच कडधान्य पेरणीत घट झाली आहे. शिवाय मध्यंतरी किडीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे कडधान्य पिके अडचणीत सापडली होती. मात्र आता काहीशी थंडी जाणवू लागल्याने कडधान्य पिकाला वाव मिळाला आहे.
रब्बी हंगामात मसूर, हरभरा, वाटाणा, मोहरी आदींची पेरणी केली जाते. मात्र यंदा पेरणी दरम्यान ढगाळ वातावरण आणि इतर कारणांमुळे म्हणावी तशी पेरणी झाली नाही. शिवाय काही ठिकाणी उगवण देखील झाली नाही. त्यामुळे कडधान्य पिकांवर परिणाम झाला. उगवण झालेल्या कडधान्यावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता. काही ठिकाणी रोग वाढल्याने कडधान्य पीक करपून गेले होते.
येळ्ळूर, धामणे, झाडशहापूर, वडगाव, मजगाव यासह पूर्वभागातील बसवण कुडची, निलजी, सांबरा आदी भागात मसूर, वाटाणा, हरभरा आदी कडधान्य बहरताना दिसत आहे. काही ठिकाणी कडधान्यांवर परिणाम झाला तर काही ठिकाणी थंडीमुळे पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र यंदा कडधान्य उत्पादनावर परिणाम झाला आहे.
यंदा उत्पादनावर होणार परिणाम
यंदा कडधान्य पेरणीत घट झाली आहे. शिवाय उगवणीनंतर रोगाचा प्रादुर्भाव होवून परिणाम झाला आहे. एकूणच कडधान्य उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. साहजिकच कडधान्यांच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.