अहवालात अनुमान व्यक्त : भारत सरकारचा आकडेवारीवर आक्षेप
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना महामारीमुळे झालेल्या मृत्यूंवरून जागतिक आरोग्य संघटनेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार भारतात कोरोनामुळे 47 लाखांहून अधिक लोकांनी जीव गमावला आहे. तर भारताचा अधिकृत आकडा 5 लाखांपेक्षा काहीसा अधिक आहे. अशा स्थितीत भारत सरकारने डब्ल्यूएचओच्या अहवालावर आक्षेप दर्शविला आहे.
डब्ल्यूएचओने कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची प्रसिद्ध केलेली संख्या आणि आरोग्य मंत्रालयाच्या संख्येत जमीन आसमानाचा फरक आहे. 1 जानेवारी 2020 ते डिसेंबर 2021 दरम्यान भारतात कोरोनामुळे 47 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे.
कोरोना महामारीमुळे जगभरात दीड कोटींहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि भारतातील हा आकडा पूर्ण जगाच्या मृत्यूंच्या एक तृतीयांश असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. जगभरात होणाऱया मृत्यूंची योग्य गणना करण्यात आलेली नाही. भारतात झालेल्या गणनेपेक्षा सुमारे 10 पट अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे.
डब्ल्यूएचओने ज्या पद्धतीचा वापर करत हा अनुमान व्यक्त केला आहे, त्याला ऍक्सेस डेथ म्हटले जाते. या पद्धतीत महामारीला सामोरे जाणाऱया क्षेत्राच्या मृत्यूदराच्या आधारावर किती लोकांचा मृत्यू झाला असेल याचे आकलन केले जाते. हा आकडा महामारीचा प्रभाव दर्शवितो, तसेच यातून स्वतःची आरोग्य व्यवस्था सुधारण्याची शिकवण संबंधित देशांनी घेणे अपेक्षित आहे. संकटसमयी उत्तम आरोग्य सुविधाच मानवतेचे रक्षण करू शकतात असे डब्ल्यूएचओच्या महासंचालकांनी म्हटले आहे.
ऑगस्ट 2020 पर्यंत कठोर लॉकडाउन असेपर्यंत कोरोनामुळे होणाऱया मृत्यूंचे प्रमाण होत होते. यादरम्यान 62 हजार लोकांचा मृत्यू झाला. सप्टेंबरपासून बळींचा आकडा वेगाने वाढू लागला आणि अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेने हाहाकार उडविला. ही लाट एप्रिल-मे आणि जूनमध्ये टोकाला पोहोचली होती आणि तोपर्यंत 27 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचे डब्ल्यूएचओकडून सांगण्यात आले.
भारत सरकारने डब्ल्यूचओच्या या आकलन पद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. या आकलनाच्या प्रक्रियेवर भारताने यापूर्वीही आक्षेप नोंदविला होता. तरीही डब्ल्यूएचओकडून मृत्यूदराचे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे.