हा जनतेचा विश्वासघात ः भाजपची टीका, नव्या सरकारला काँगेस-डाव्यांचा पाठिंबा
पाटणा / वृत्तसंस्था
बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्तापालट झाला आहे. गेले 20 महिने सत्तेवर असणारे भाजप-संजद युतीचे सरकार कोसळले असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपशी असणारी युती तोडली आहे. आता त्यांच्या संजद पक्षासह तेजस्वी यादव यांचा राजद, काँगेस आणि डावे पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करणार, हे निश्चित झाले आहे. नितीशकुमार हेच नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असतील.
बिहारमध्ये सत्तांतराचे वेध गेल्या एक आठवडय़ापासूनच लागले होते. सत्ताधारी भाजप आणि नितीशकुमार यांचा संजद या पक्षांमध्ये मतभेद उफाळून आले होते. मंगळवारी नितीश कुमार यांनी संजदच्या विधीमंडळ पक्षाची बैठक बोलाविली होती. सोमवारी त्यांनी काँगेस नेत्या सोनिया गांधी यांना फोन करून स्थितीची कल्पना दिली होती. त्याचवेळी सत्तांतर होणार याची चिन्हे दिसू लागली होती.
बैठकीत अंतिम निर्णय
मंगळवारी संजदच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत नितीश कुमार यांनी भाजपशी युती तोडण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला सर्व उपस्थितांनी पाठिंबा दिला. या बैठकीत संजदच्या 43 आमदारांसह सर्व खासदारही उपस्थित होते. सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. एकमुखी निर्णय झाल्यानंतर त्वरित नितीश कुमार यांनी बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली.
मुख्यमंत्र्यांचा राजीनामा
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे पदाचा आणि आपल्या सरकारचा राजीनामा सादर केला. राज्यपालांनी तो स्वीकारला असून पुढील व्यवस्था होईपर्यंत त्यांनाच पदावर राहण्यास सांगितले. याचवेळी तेजस्वी यादव यांच्या राजद पक्षानेही बैठकीचे आयोजन केले होते. नितीशकुमार भाजपशी युती तोडणार असतील तर त्यांच्या बरोबर सरकार स्थापन करण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी सोमवारीच स्पष्ट केले होते. डाव्या पक्षांनीही त्यांना पाठिंबा घोषित केला होता. त्यामुळे सत्तांतर होणार हे निश्चित झाले होते.
पुन्हा सरकार स्थापनेचा दावा
सायंकाळी चार वाजता नितीशकुमार तेजस्वी यादव यांच्यासह पुन्हा राज्यपालांच्या भेटीस गेले. त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. त्यांना पाठिंबा देणाऱया सर्व पक्षांनीही त्यांची समर्थनपत्रे राज्यपालांना सादर केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांच्या दाव्यावर राज्यपाल लवकरच निर्णय घेणार आहेत.
राजदला सत्तेत संधी
तेजस्वी यादव यांना प्रथमच सत्तेत संधी मिळणार आहे. त्यांचे पिता लालू प्रसाद यादव यांनी राजद हा पक्ष स्थापन केला होता. ते बिहारचे तीनवेळा मुख्यमंत्री होते. मात्र, चारा घोटाळय़ात त्यांना शिक्षा झाल्याने त्यांना मुख्यमंत्रिपदाचा त्याग करावा लागला होता. आता राजदची सूत्रे तेजस्वी यादव यांच्या हाती आहेत. 2020 ची विधानसभा निवडणूक त्यांच्या नेतत्त्वात पक्षाने लढविली होती. पण यश थोडक्यात हुकले होते. आता त्यांचा पक्षही संजदबरोबर सत्तेत सहभागी होईल.
हा तर जनतेचा विश्वासघात
नितीशकुमार यांनी भाजपच्या युतीत 2020 ची विधानसभा निवडणूक जिंकली होती. त्यांच्या पक्षाला अवघ्या 43 जागा मिळाल्या असूनही त्यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आले. त्यांच्याशी जुळवून घेण्याचा शक्य तेवढा प्रयत्न भाजपने मोठा पक्ष असूनही केला. तथापि, आता त्यांनी कोणतेही कारण नसताना युती तोडून जनतेचा विश्वासघात केला आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत आणि त्यापुढच्या विधानसभा निवडणुकीत बिहारची जनता त्यांना धडा शिकविल्याखेरीज राहणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपच्या बिहार शाखेचे अध्यक्ष संजय जयस्वाल यांनी व्यक्त केली आहे. बिहारमधील अनेक भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली.
युती का तुटली ?
2020 च्या नोव्हेंबरात बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत चुरशीच्या संघर्षात भाजप-संजद युतीने तसेच दोन छोटय़ा पक्षांसह निसटता विजय मिळविला होता. 243 सदस्यांच्या विधानसभेत रालोआला 125 तर राजद-काँगेस-डावे पक्ष यांच्या ‘महागठबंधन’ला 110 जागा मिळाल्या होत्या. 8 जागांवर अपक्ष व इतर विजयी झाले होते. नितीशकुमार यांच्या संजदला अवघ्या 42 जागा मिळूनही त्यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. नंतरच्या काळात भाजप आणि संजद यांच्यातील मतभेद वाढत गेले. भाजपमुळे आपल्या कमी जागा आल्या असा संजदचा समज होता. त्याचवेळी केंद्र सरकारमध्ये संजदचे नेते सीआरपी सिंग हे मंत्री होते. मात्र ते भाजपच्या जवळचे आहेत, असे कारण दाखवत नितीश कुमार यांनी त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सिंग यांनी काही दिवसांपूर्वी संजदचा त्याग केला होता. भाजप-संजद वादात ही घटना निर्णायक ठरली होती. शिवाय बिहार सरकारकारचे अन्य अनेक निर्णय दोन्ही पक्षांच्या मतभेदांना कारण ठरले होते. गेल्या दोन महिन्यांपासूनच दोन्ही पक्षांमधील वाद विकोपाला गेल्याचे दिसत होते. अखेर मंगळवारी नितीश कुमार यांनी ही युती तोडण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात नवी सत्तासमीकरणे निर्माण झाली असून पुन्हा संजद-राजद-काँगेस अशी युती सत्तेवर येत आहे.
‘घटस्फोटां’नी भरलेला राजकीय प्रवास
नितीश कुमार यांनी आतापर्यंत अनेकदा राजकीय ‘घटस्फोट’ घेतलेले आहेत. 1970 च्या दशकात जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून त्यांच्या राजकीय वाटचालीचा प्रारंभ झाला. ते प्रथम लालू प्रसाद यादव यांचे निकटचे सहकारी म्हणून ओळखले जात असत. मात्र, प्रथम 1997 मध्ये त्यांनी लालू प्रसाद यादव यांचा हात सोडून भाजपशी संधान बांधले. भाजपशी त्यांची युती प्रदीर्घ काळ (जवळपास 16 वर्षे) टिकली. या काळात युतीने 2005 आणि 2010 अशा दोन वेळा विधानसभा निवणूक प्रचंड बहुमताने ंिंजकली. मात्र, 2013 मध्ये भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2013 मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड केल्यानंतर याच पदाचे इच्छुक असणारे नितीश कुमार यांनी भाजपशी युती तोडली. मात्र 2014 च्या निवडणुकीत त्यांच्या संजदचा दारुण पराभव झाला. त्यानंतर 2015 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक राजदसह लढून मोठा विजय मिळविला. तथापि ही युती 2017 मध्ये तुटली. त्यानंतर ते पुन्हा भाजपच्या युतीत आले. 2020 मध्ये या युतीने निसटता विजय मिळविला. त्यानंतर 20 महिन्यांनी ते पुन्हा राजदच्या जवळ गेले असून त्यांनी नवा डाव मांडला आहे. अशा प्रकारे प्रथम लालू प्रसाद यादव, नंतर भाजप, पुन्हा लालू प्रसाद यादव, नंतर पुन्हा भाजप आणि आता पुन्हा राजद असा त्यांच्या राजकीय युत्यांचा प्रवास आहे.
बॉक्स
विधानसभेतील पक्षीय बलाबल (एकंदर जागा 243)
नितीशकुमार समर्थक पक्ष
संयुक्त जनता दल (संजद) 45
राष्ट्रीय जनता दल (राजद) 79
काँगेस 19
डावे पक्ष 16
हिंदुस्थानी आवाम मोर्चा 04
एकंदर 163
भाजप समर्थक पक्ष
भारतीय जनता पक्ष (भाजप) 77
लोकजनशक्ती पक्ष (लोजप) 01
एकंदर 78
अपक्ष व इतर
अपक्ष 01
एमआयएम 01
एकंदर 02