यंदाच्या दिवाळीत प्रदूषणाचा त्रास होऊ नये, यासाठी देशातील विविध राज्यांनी फटाक्यांविरोधात कठोर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला असून, राजधानी दिल्लीतही फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. फटाके वाजविण्यासाठी अनेक नियम लागू करण्यात आले असून ते कठोरपणे आणि काटेकोरपणे लागू करण्यात यावेत, असे दिशानिर्देश स्थानिक अधिकाऱयांना देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर या वर्षीचा दीपोत्सव फटाकेमुक्त होणार की फटाकेयुक्त, याकडे देशाचे लक्ष असेल.
फटाक्यांच्या अनिर्बंध आतषबाजीमुळे दिवाळीनंतर देशभरात प्रदूषणाची पातळी मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याचा अनुभव दरवर्षी येतो. राजधानी दिल्ली व परिसरात तर हा प्रश्न गंभीर व गडद रूप धारण करीत असल्याचे पहायला मिळते. हे पाहता यंदाची दिवाळी अधिक स्वच्छ आणि शुद्ध वातावरणात पार पडावी, यासाठी अनेक राज्य सरकारांनी कंबर कसल्याचे दिसून येते. याबाबतच्या उपाययोजना गंभीरपणे लागू करण्यात आल्या, तर प्रदूषणाचा स्तर निश्चितपणे कमी होईल, अशी भावना आहे.
भारताची वायू प्रदूषणाची स्थिती
भारत हा विकसनशील देश आहे. येथे मोठय़ा प्रमाणात उद्योग-व्यवसाय वाढीस लागत आहेत. यामुळेच उद्योगांचा 51 टक्के इतका वायू प्रदूषणात मोठा हातभार लागत आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, जगभरातील 30 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये 21 शहरे ही भारतातील आहेत. त्यात अहमदाबाद व दिल्ली ही प्रमुख शहरे आहेत. तसेच दरवर्षी साधारण 2 मिलियन लोकांना वायू प्रदूषणाचा त्रास होतो. यामध्ये वृद्ध तसेच बालकांचा सर्वाधिक समावेश आहे.
दिल्ली ः सरकारची बंदी
दिल्लीतील सरकारने सर्व प्रकारच्या फटाक्यांवर केवळ दिवाळीतच नव्हे, तर 1 जानेवारी 2023 पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घोषित केला आहे. दिवाळीला फटाके वाजविणाऱयांना सहा महिन्याचा कारावास आणि 200 रुपयांचा दंड केला जाऊ शकतो. या राजधानीच्या शहरात फटाक्यांचे उत्पादन, साठा आणि विक्रीवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. असा प्रतिबंध गेली सलग दोन वर्षे सुरू आहे. त्याचे परिणाम बऱयापैकी दिसून आल्याने यंदाही बंदी कायम ठेवण्यात आली आहे. या बंदीचे पालन कठोरपणे करण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला.
पंजाब ः केवळ दोन तास अनुमताr
पंजाब सरकारने दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रतिदिन केवळ दोन तास फटाके वाजविण्यास अनुमती देण्याचा निर्णय घेतला आहे. फटाक्यांचे उत्पादन, साठा आणि विक्रीवर तसेच वितरणावर पूर्ण बंदी आहे. केवळ परवानापत्र असणाऱया व्यापाऱयांना काही प्रमाणात फटाक्यांची विक्री करण्याची अनुमती देण्यात आली आहे. गुरु नानकदेव यांच्या प्रकाशपर्व काळात 8 नोव्हेंबरला पहाटे चार ते ग्नपाच वाजेपर्यंत तर त्याच दिवशी रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत अनुमती आहे.
पश्चिम बंगाल ः हरित फटाक्यांना अनुमती
पश्चिम बंगाल सरकारने राज्यात दिवाळीच्या काळात केवळ हरित फटाक्यांना अनुमती देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्र सरकारच्या दोन प्राधिकरणांनी तयार केलेल्या नियमांचा आधार घेतला जाणार आहे. कोलकाता उच्च न्यायालयानेही सरकारला अनेक दिशानिर्देश दिले आहेत. त्यानुसार केवळ क्युआर कोड असणाऱया फटाक्यांचीच आयात आणि विक्री करण्यास अनुमती देण्यात आली. नियमभंग करणाऱयांविरोधात कठोर कारवाई करा, अशीही सूचना आहे.
तामिळनाडू ः गेली चार वर्षे बंदी
तामिळनाडू राज्यात गेली चार वर्षे फटाक्यांवर बंदी आहे. याच राज्यात देशातील सर्वांत जास्त फटाक्यांचे उत्पादन केले जाते. येथील फटाके देशभर आणि विदेशातही विकले जातात. पण तामिळनाडूत मात्र चार वर्षांपासून बंदी आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये सकाळी सहा ते सात आणि संध्याकाळी सात ते आठ या कालावधीत फटाके वाजविण्यास अनुमती देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश ः बंदी नाही, पण नियम कठोर
उत्तर प्रदेश सरकारने फटाक्यांच्या संदर्भात नवा मार्ग अवलंबिला आहे. या राज्यात फटाक्यांवर पूर्ण बंदी घातलेली नाही. मात्र, ते वाजविण्याचे नियम कठोर आहेत. सर्व फटाक्यांची दुकाने दिवाळीच्या दिवसात लोकवस्त्यांपासून दूर स्थापित केली जाणार आहेत. अधिक प्रदूषणकारी फटाक्यांच्या खरेदी-विक्रीला प्रतिबंध केला जाणार आहे. फटाके वाजविण्यावर फारसे कडक नियम नसले तरी प्रदूषणकारी फटाक्यांची आयात राज्यात होऊ नये, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व जिल्हा प्रशासनांना प्रदूषण नियंत्रणाचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
वायू प्रदूषणाची प्रमुख कारणे
वातावरणातील हवेची गुणवत्ता खालावणे म्हणजे वायू प्रदूषण होय. वायू प्रदूषणाची काही महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे ः
उद्योग क्षेत्र ः मोठमोठय़ा कारखान्यातून निघणारा हानीकारक धूर हा सर्रासपणे वातावरणात सोडला जातो. याशिवाय औष्णिक वीज केंद्रामधून निघणारा धूर आणि रासायनिक उद्योगामधून तयार होणारे साहाय्यक घटक हे हवेत सोडले जातात. ही सर्व मानवनिर्मित प्रदूषणाची मुख्य कारणे आहेत. यामुळे हवेचा दर्जा खालावतो आणि हवा प्रदूषित होते.
वाहनांचा वापर ः वाहनातून निघणारा धूर ही वायू प्रदूषणात भर टाकणारी मोठी बाब आहे. देशात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून प्रदूषणाच्या वाढत्या समस्येमध्ये वाहनांचा हिस्सा मोठा आहे. यावर तोडगा म्हणून आता इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय आला आहे.
वृक्षतोड ः वृक्षतोडीमुळेही प्रदूषणाची पातळी वाढण्यास मदत होते. वाढते शहरीकरण, लोकसंख्या वाढ यामुळे वनसंपदा मोठय़ा प्रमाणात कमी होऊ लागली आहे. वृक्षतोडीमुळे मृदेची धूप होते. त्यामुळे मातीचे बारीकसारीक कण हवेत पसरतात आणि हवा प्रदूषित होते.
कचरा जाळपोळ ः रोजचा कचरा हा कितीतरी मेट्रिक टनमध्ये असतो. हा कचरा जमा करून डम्पिंग ग्राउंडवर नेऊन टाकला जातो. अशा या कचऱयाची योग्य विल्हेवाट न लावता तो तिथेच जाळण्यात येतो. मग त्यामध्ये सर्वच प्रकारचा कचरा असतो. कचरा हा उघडय़ावर जाळल्यामुळेही वायू प्रदूषण घडून येते.
शेतीसंबंधीचे हवा प्रदूषण ः काही शेतकरी आपल्या शेतीतील पीक काढून घेतल्यानंतर पिकांचे राहिलेले अवशेष शेतातच जाळून टाकतात. रासायनिक खते किंवा औषधींची फवारणी करताना बारीक तुषार हवेत पसरतात. शेताची नांगरणी करताना उडणारा मातीचा धूर, या सर्व कारणांमुळे हवा प्रदूषित होते. यामुळे पंजाबमध्ये प्रदूषणामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे.
पर्यावरणावर मोठा ताण
वातावरणातील विषारी वायूंमुळे पर्यावरणावर मोठा आघात होत आहे. अतिनील किरणांपासून बचाव करणाऱया ओझोनच्या थराला बाधा पोहोचली आहे. पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे हवामानात बदल, उष्णतेची लाट, अतिवृष्टी, हिमनद्यांचे वितळणे, समुद्रपातळीत वाढ अशा घटना वाढत आहेत. कोरोनाच्या काळात 2019 ते 2020 मध्ये संपूर्ण जग थांबले होते. या काळात पर्यावरणाची हानी भरून काढण्यास मदत झाली. प्रदूषण तर कमी झालेच, पण ओझोनच्या थराची हानीही काही अंशी भरून निघाली.
भारतातील वायू प्रदूषणाची मापके
भारतातील हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी एअर क्वॉलिटी इंडेक्स वापरला जातो. यात ओझोन, कार्बन मोनोक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर, अमोनिया, पीएम 2.5, तसेचग्न पीएम 10 आदींचे रोज मोजमाप केले जाते. त्याद्वारे वायू प्रदूषण समजून येते. सध्या दिल्ली, अहमदाबाद, दिल्ली, पटना, गुरुग्राम, लखनौ, आदी शहरांची वायू गुणवत्ता दररोज तपासण्याचे काम भारत सरकारद्वारे केले जाते. यासाठी खालीलप्रमाणे वर्गवारी करण्यात आली आहे. त्या गुणकांद्वारे शहरांची वायू गुणवत्ता ठरवली जाते. यासाठी रंगांचाही वापर करण्यात येतो.
0-50 चांगली
51-100 समाधानकारक
101-200 मॉडरेट
201-300 खराब
301-400 अत्यंत खराब
401-500 असहनीय
दिवाळीत प्रदूषणात वाढ
दिवाळीच्या धामधुमीत फटाक्यांना विशेष महत्त्व आहे. मात्र, हे फटाकेच वायू प्रदूषण वाढीस कारणीभूत ठरतात. सल्फर व कार्बन यांचे मोठय़ा प्रमाणात उत्सर्जन फटाक्यांमधधून होत असते. दिवाळी सर्वसाधारणपणे थंडीच्या महिन्यात असते. वातावरणातील दूषित कण हवेतच तरंगत राहिल्यामुळे श्वसनामध्ये मोठय़ा प्रमाणात त्रास होतो. यामुळेच दिल्ली सरकारने आता फटाक्यांवर बंदी घातली आहे.
एकूणच अनिर्बंध फटाकेबाजीमुळे प्रदूषणाच्या पातळीत होणारी धोकायदायक वाढ पाहता त्यावर निर्बंध असायलाच हवेत, असे तज्ञ म्हणतात. हे पाहता अनेक राज्यांनी आतषबाजीवर मर्यादा आणल्या आहेत. हा पॅटर्न यावर्षी कशा पद्धतीने राबविला जातो आणि आगामी काळात तो अधिक व्यापकपणे जीवनशैलीचा भाग ठरतो का, हे पाहण्यासाठी काही काळ वाट पहावीच लागेल.
वायू प्रदूषण कमी करण्याचे उपाय
@उद्योग क्षेत्रांतून निघणारा रासायनिक धूर कमी करण्यासाठी योग्य त्या उपकरणांचा किंवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा.
@जिथे शक्मय असेल तिथे सार्वजनिक वाहनांचा वापर करावा.
@वृक्षतोड थांबवावी व सार्वजनिक वनीकरणसारख्या कार्यक्रमांना चालना द्यावी.
@नवीन इमारती बांधतांना वृक्ष लागवड किंवा बागेसाठी राखीव जागा सोडण्याची अट घालावी.
@टाकाऊ कचरा न जाळता त्याची विल्हेवाट कशी लावता येईल, त्याबद्दल विचार करावा.
@शेतीसंबंधी जे अवशेष जाळण्यात येतात, ते न जाळता त्यापासून खत तयार करणारे तंत्रज्ञान वापरावे.
@लोकसंख्या वाढीला आळा घालणे.
@अपारंपरिक उर्जा स्रोतांचा वापर वाढविणे.
@जनजागृती अभियान राबविणे.
@शासनाद्वारा वायू प्रदूषण विरुद्ध कठोर कायदे तयार करणे.
संकलन…अर्चना माने-भारती, पुणे