पावसाअभावी पिके सुकून जाण्याच्या मार्गावर, तालुक्याच्या पश्चिम भागात दुष्काळी परिस्थिती? बळीराजा चिंताग्रस्त
वार्ताहर /किणये
गेल्या महिन्याभरापासून तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाने हुलकावणी दिली आहे. पावसाअभावी शेत शिवारातील पिके सुकुन जाऊ लागली आहेत. सध्या पीक पाणी मागत आहे. पिकांना पाण्याची गरज आहे. सध्या पाऊस न झाल्यास यंदा दुष्काळाच्या मार्गावर तालुका आहे. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त बनला आहे. बेळगाव तालुक्यात खरीप हंगामात भात हे मुख्य पीक घेतले जाते. काही शिवारांमध्ये भात बऱ्यापैकी बहरून आलेले आहे. मात्र पाऊस नसल्यामुळे पिके सुकून जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा तालुक्यात म्हणावा तसा मान्सून झाला नाही. मृग नक्षत्राच्या प्रारंभी पावसाने पाठ फिरवली होती. आर्द्रा नक्षत्राच्या अखेरीस पाऊस बरसण्यास सुरुवात झाली. आणि जेमतेम पंधरा-वीस दिवस बऱ्यापैकी पाऊस झाला. मात्र गेल्या महिन्याभरापासून पावसाने पाठ फिरवली असल्यामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे.शिवारातील पाणी कमी झालेले आहे. काही ठिकाणच्या शिवारामध्ये तर पाऊस नसल्यामुळे शेतातील जमिनीत भेगा पडलेल्या दिसून येऊ लागल्या आहेत. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात रताळी पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेले आहे. माळरानावरील शेत शिवारांमध्ये रताळी बांध तयार करून त्यावर वेल लागवड केलेली आहे. या रताळी पिकात औषध फवारणी करण्यात आली आहे. काही ठिकाणी शेतकरी रताळ्यामध्ये भांगलण करीत आहेत. मात्र पावसाअभावी वेलीची वाढ खुंटल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. पाऊस झाला नाही तर जमिनीमध्ये रताळी अधिक प्रमाणात होणार नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या पंधरा-विस दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी नाचणा लागवड केली आहे. नाचणा व इतर सर्वच पिकांना आता पाण्याची नितांत गरज आहे. पाऊस झाला नाहीतर दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार असल्याची भीती शेतकऱ्यांना लागून केली आहे.गुरुवारी सायंकाळी तालुक्यात ढगाळ वातावरण दिसून आले. पाऊस येणार असे संकेतही दिसत होते. पण ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि पाऊस मात्र झाला. त्यामुळे बळीराजाच्या नजरा आभाळाकडे लागून राहिलेल्या आहेत.
सर्वांना पावसाची प्रतीक्षा
शिवारात भात, भुईमूग ही पिके बऱ्यापैकी बाहेरून आलेली आहेत. या पिकांना सध्या पावसाची गरज आहे. गेल्या महिन्याभरापासून पाऊसच नाही. यामुळे नदी-नाल्याचे पाणीही कमी झाले आहे. आता शिवारातील पिकांना पाणी द्यायचे कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे. पाऊस न झाल्यास बेळगाव तालुका दुष्काळ म्हणून सरकारला घोषित करावे लागणार आहे. आम्ही सर्व शेतकरी सध्यातरी पावसाच्या प्रतीक्षेत आहोत.
– उमेश सोनोलकर, हंगरगा